भाजप नेत्याकडून अर्णब गोस्वामींची थेट महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्याशी तुलना


नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे वेगळ्या स्वरुपात दिसतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. पात्रा यांनी रिपब्लिक टीव्हीवरील एका चर्चेदरम्यान थेट महात्मा गांधी आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांच्याशी अर्णब यांची तुलना केली. या दोघांप्रमाणे अर्णब यांनाही त्रास सहन करावा लागत असून आपल्याला अर्णब भविष्यात अगदी वेगळ्या स्वरुपात दिसतील, असे पात्रा यांनी म्हटले आहे. अर्णब हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भारतीय प्रसारमाध्यमांचे नेल्सन मंडेला ठरतील आणि प्रसारमाध्यमांचे ते चेहरामोहरा बदलून टाकतील, असे मतही पात्रा यांनी व्यक्त केले.

नक्कीच अर्णब यांना न्याय मिळेल असा, विश्वास देखील यावेळी पात्रा यांनी व्यक्त केला. नक्कीच अर्णब यांना न्याय मिळेल. टीव्हीवर सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत. भारतीय संविधानावर विश्वास ठेवा. भारतीय जनता पार्टीवर किंवा सरकारवर विश्वास ठेवा, असे मी म्हणणार नाही. कारण संविधानानुसारच या दोन्ही गोष्टीही काम करतात. पहिली गोष्ट म्हणजे अर्णबला कोणीच काही नुकसान पोहचवण्याची हिंमत करु शकत नसल्याचे पात्रा म्हणाले.

सध्या अर्णब यांना झालेली अटक ही त्यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देईल. अर्णबच्या आयुष्याला कलाटणी देणारी ही घटना ठरेल, असा माझा अंदाज आहे. मी अर्णबला यापुढे भारतीय प्रसारमाध्यमांचा नेल्सन मंडेला म्हणेल. भारतीय प्रसारमाध्यमांना तो कायमचा बदलून टाकेल, असा मला विश्वास आहे. गांधींना ब्रिटीशांनी चालू ट्रेनमधून बाहेर धक्का दिल्यानंतर ते महात्मा गांधी झाल्यामुळेच त्यांनी लढा सुरु केला आणि ते पुढे खूप मोठे नेते झाले. जो त्रास त्यांना व्हायला नको होता, तसा त्रास त्यांना देण्यात आला. सध्या अर्णबला तशाच पद्धतीचा त्रास दिला जात आहे. सर्व भारतीयांना मला सांगायचे आहे की लवकरच पूर्णपणे बदलेला वेगळा अर्णब आपल्याला पहायला मिळेल, असे पात्रा यांनी यावेळी नमूद केले.

त्याचप्रमाणे अर्णब यांनी अनेक प्रकरणांबद्दल आवाज उठवल्याने त्यांना त्रास दिला जात असल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे. उशीरा दिलेला न्याय हा अन्यायच असल्याचे सांगत मी हात जोडून न्यायालयातील मान्यवरांना विनंती करतो की सर्व प्रकारे दोषी ठरलेल्या दहशतवाद्यासाठी आपण रात्री न्यायालयाचे कामकाज केले आहे. याकुब मेननसारख्या व्यक्तीसाठीही न्यायालये रात्री उघडली. अर्णबचा दोष काय होता तर त्याने पालघरमधील साधुंसाठी न्यायाची मागणी केली, एका मरण पावलेल्या अभिनेत्याला (सुशात सिंह राजपूतला) त्याला न्याय मिळवून द्यायचा होता, अंमलीपदार्थ मुक्त भारत त्याला हवा होता. काही राजकारण्यांची नाव त्याने घेतली, त्यांच्यावर टीका केली म्हणून हे सर्व काही त्याला सहन करावे लागत आहे याबद्दल खेद आहे. पण आता भारत जागृक देश आहे आणि कोणासमोरही भारत झुकणार नसल्याचे मत पात्रांनी व्यक्त केले.

अर्णबच्या सुटकेसाठी आपल्याला अनेकांचे फोन येत असल्याची माहिती सोमवारी संध्याकाळी रिपब्लिक टीव्हीवरील चर्चा सत्रामध्ये सहभागी झालेल्या पात्रा यांनी दिली. काहीही करा आणि अर्णबला तुरुंगातून बाहेर काढा अशी मागणी करणारे अनेक फोन मला आले. असे फोन करणाऱ्यांची मी हात जोडून माफी मागतो की मला सर्वांचे फोन उचलता आले नाहीत. देशभरातून आम्हाला फोन येत आहेत. मी अशाप्रकारचा पाठिंबा आतापर्यंत कोणत्याच पत्रकारासाठी पाहिला नसल्याचेही पात्रा म्हणाले.