मुंबई – ब्राह्मण समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले, असे वक्तव्य केले होते, पुण्यातील ब्राह्मण महासंघाने त्यावरून खडसेंच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, त्यांनी तातडीने माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावरुन आता ट्विट करुन माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.
या प्रकरणावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले होते की, फडणवीसांवर टीका करताना एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले त्यांनी ते मागे घ्यावे, अन्यथा खडसेंचा एकही कार्यक्रम पुण्यात होऊ देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत त्यांच्या वक्तव्याचे परिणाम भोगावे लागतील.
त्याचबरोबर दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी, एकनाथ खडसेंना हे ज्ञात नाही याचे आश्चर्य वाटते, आपले वक्तव्य एकनाथ खडसेंनी मागे घ्यावे, अन्यथा खडसेंना पुण्यात आल्यानंतर जाब विचारण्यात येईल. आनंद दवेंनी यासंदर्भात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना निवेदनही दिले असल्यामुळे एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची शक्यता होती.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 9, 2020
एकनाथ खडसेंनी ब्राह्मण महासंघाच्या इशाऱ्यानंतर ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे खडसेंनी म्हटले आहे.