उच्च न्यायालयाने फेटाळला अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिन अर्ज


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या अर्णब गोस्वामी यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण गोस्वामी यांना उच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. त्यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावत गोस्वामी यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश दिले.

शनिवारी (७ नोव्हेंबर) अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी संपली. सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा त्यावेळी विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय आम्ही लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी आम्हाला घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले होते.

आज अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिला. गोस्वामी यांची जामीनाची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचे प्रकरण नसल्यामुळे कनिष्ठ न्यायालयात आरोपी जाऊ शकतो. चार दिवसांच्या कालावधीत कनिष्ठ न्यायालय त्यावर निर्णय घेईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.