भारत हा जगातला सर्वाधिक तरुण देश आहे असे आपण अभिमानाने सांगतो कारण या देशाच्या लोकसंख्येपैकी ६० टक्के लोकसंख्या तरुण आहे. परंतु देशाची लोकसंख्या केवळ तरुण असण्याने देशाचे कल्याण होणार नाही. हे तरुण शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिकदृष्ट्या किती सशक्त आहेत यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. याबाबतीत भारतामध्ये चिंता करावी अशी स्थिती आहे. मुलांना मिळणार्या पोषण द्रव्यांचा अभ्यास करणार्या एका संस्थेने भारतातील ५० टक्के युवती आणि ३० टक्के युवक अशक्त असल्याचे दाखवून दिले आहे.
दर दोन मुलींमागे एक मुलगी आणि दर तीन मुलांमागे एक मुलगा अशक्त म्हणजे ऍनिमिक आहे. असे या संस्थेच्या पाहणी आढळून आले. या मुलांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण आवश्यक त्या मर्यादेपेक्षा कमी आहे. विशेषतः पौगंडावस्थेतील मुलामुलींमध्ये असणारी अशक्तता अधिक चिंताजनक आहे. कारण देशाच्या लोकसंख्येपैकी २० टक्के लोकसंख्या पौगंडावस्थेतील मुलामुलींची आहे.
आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ या राज्यांमध्ये पौगंडावस्थेतील मुली अशक्त असण्याचे प्रमाण विशेषत्त्वाने जास्त आहे. खरे म्हणजे ही अशक्तता कमी करणे फार अवघड नाही परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. खाद्य पदार्थातील लोहाचे प्रमाण कमी असणे हे या अशक्तपणाचे मूळ कारण आहे. स्वयंपाकाची भांडी आवर्जुन लोखंडाची वापरली तरी एवढ्या एका उपायाने अशक्तपणाचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. परंतु या संबंधात देशात पुरेशी जागृती झालेली नाही. अशक्तपणाचे हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे.