बिहार विधानसभा निवडणुकीत जनतेचा राजद-काँग्रेसला कौल


नवी दिल्ली – काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत. या एक्झिट पोलनुसार राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे बिहारच्या जनतेने सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. राजद हा यामध्ये सर्वात मोठा पक्ष तर भाजप दुसरा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

२४३ जागांसाठी बिहारमध्ये शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले. १२२ ही मॅजिक फिगर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार एकहाती सत्ता कोणत्याही पक्षाला काबीज करता येणार नाही. पण, भाजप-जदयूच्या एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये चुरशीची लढत होईल. तरी यामध्ये महागठबंधनचे पारडे जड राहण्याची शक्यता आहे.

एबीपी-सी वोटरच्या सर्वेनुसार १०४ ते १२८ जागा एनडीएला मिळू शकतील. तर १०८ ते १३१ जागा महागठबंधनला मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर भाजपला ६६ ते ७४, जदयूला ३८ ते ४६, राजदला ८१-८९, काँग्रेसला २१-२९, लोजपाला १-३ आणि अन्य पक्षांना ६-२३ जागा मिळतील असा अंदाज आहे.

रिपब्लिक भारत जन की बातच्या सर्वेनुसार भाजप-जदयूला (एनडीए) ९१-११७ तर राजद-काँग्रेसला (महागठबंधन) ११८-१३८ जागा मिळतील. तसेच लोजपाला ५-८ आणि अन्य पक्षांना ३ ते ६ जागा मिळतील.

टाइम्स नाऊ-सी वोटरच्या सर्वेनुसार ११६ एनडीएला तर १२० जागा महागठबंधनला मिळतील. तर लोजपाला १ आणि अन्य पक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया टीव्ही अॅक्सिस पोलच्या सर्वेनुसार, सर्वाधिक जनता राजदचे सर्वात प्राध्यान्यक्रम असलेले उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र ३१ वर्षीय तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी उत्सुक आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव (राजद) – ४४ टक्के, नितीश कुमार (जदयू) – ३५ टक्के तर चिराग पासवान (लोजपा) – ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.