दिवाळीनंतर घेतला जाईल राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भात निर्णय – मुख्यमंत्री


मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक मुद्यांवर भाष्य केले. सर्वांना राज्यात मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न पडला होता, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता स्पष्टीकरण दिले आहे. दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल,असे मुख्यमंत्री म्हणाले.

दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे उघडण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. पण, त्याबाबत घाई करून चालणार नाही. आपल्याला सर्वप्रथम मंदिरे सुरु करण्यासंदर्भातील नियमावली तयार केली पाहिजे. अन्यथा तासनसात मंदिरात नामस्मरणात तल्लीन राहणाऱ्या आपल्या घरातील ज्येष्ठांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेकजण माझ्यावर मंदिरे उघडत नाही म्हणून टीका करत आहेत. पण, तुम्हा सगळ्यांची काळजी मला असल्यामुळे मंदिरे उघडण्याचा निर्णय योग्यवेळीच घेतला जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.