जनधन खातेधारकांकडून आकारले जाणार नाही ‘ते’ शुल्क


नवी दिल्ली – जनधन खातेधारकांना देशातील बँकांनी मोठा दिलासा दिला आहे. या संदर्भात एक मोठी घोषणा बँकांनी करत असे म्हटले आहे की, पैसे काढणे किंवा भरण्यासाठी जनधन खातेधारकांना आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोणत्याही प्रकारचा शुल्क बँकांनी बचत खात्यावर आकारला जाणार नसल्याचे म्हटले आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीआयसीआय बँकेने सर्व बचत खाते आणि जनधन खात्यांवर कोणत्याही प्रकारचे चार्ज लावणार नसल्याचे म्हटले आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँक यांनी सुद्धा जनधन खात्यावर कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. बँकांकडून बचत खात्यात मर्यादित रक्कम नसल्यास शुल्क आकारले जातात.

नुकत्याच इतर माध्यमांकडून प्रसारित केल्या जात असलेल्या बातम्यांमधून असा दावा केला गेला आहे की, जनधन खात्यामधून प्रत्येक वेळी पैसे काढल्यास 100 रुपये शुल्क आकारला जाणार आहे. पण याबद्दल सरकारने स्पष्टीकरण दिले असून अशा पद्धतीच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

आपल्या फॅक्टचेकमध्ये पीआयबीने असे म्हटले होते की, जनधन खात्यामधून मोफत बँकिंग सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही आहे. सर्व बँकांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. तसेच जनधन खात्या संबंधित चार्ज करण्यासबद्दल निर्देशन जाहीर केलेले नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच कार्यकाळातील वर्षात देशात सर्व नागरिकांना बँकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान जनधन योजनेची सुरुवात केली होती. प्रत्यके परिवाराने या योजनेच्या उद्देशामुळे एक बँक खाते सुरु केले होते. कोरोना व्हायरसच्या काळात सरकारकडून थेट मदत दिली गेली. जनधन योजनेअंतर्गत 10 वर्षाखालील मुलाचे सुद्धा खाते सुरु केले जाऊ शकते. या योजनेअंतर्गत खाता सुरु केल्यास रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघाती विमा कवर आणि 30000 रुपयांचा लाइफ कवर आणि जमा रक्कमेवर व्याज मिळणार आहे.