फळांचा रस आरोग्यदायी असतो असा आपला ठाम समज आहे. मात्र आपल्या या समजाला धक्का देणारी बाब संशोधनातून नुकतीच समोर आली आहे. संशोधकांचे असे म्हणणे आहे की एक ग्लास कोलासारखे शीतपेय शरीराला जितके अपायकारक आहे, तितकाच १ ग्लास फ्रूट ज्यूसही आहे.
संशोधक याबाबतचे स्पष्टीकरण देताना सांगतात, आख्खे फळ खाण्याऐजवी जर त्याचा रस काढला गेला तर त्यात फायबर रहात नाहीच पण ताज्या रसाला चव आणण्यासाठी वरून साखर घालावी लागते. म्हणजेच प्रत्यक्ष फळापेक्षा रसात साखरेचे प्रमाण जास्त होते. रस काढल्यामुळे फळांतील जीवनसत्त्वे कमी होतात. टेट्रा पॅक मधील फळाचा रस पॅक करण्यापूर्वी वर्षभर काढलेला आणि मोठ्या कंटेनरमध्ये ऑक्सिजन शिरू न देता साठविलेला असतो. या प्रोसेसमध्ये फळाचा खरा स्वाद नष्ट होतो व त्यामुळे रसाला चव आणण्यासाठी कृत्रिम फ्लेवर्स वापरले जातात.
फळांच्या रसांना आकर्षक रंग आणण्यासाठी व गोडी वाढविण्यासाठी वापरले जाणारे रंग व स्वीटनरमुळे रसाची पोषणमूल्ये कमी होतात. त्यापेक्षा आख्खे फळ अधिक पोषणमूल्ये देते. याचा अर्थ असाही आहे की कोणत्याही शीतपेयांपेक्षा अथवा फ्रूट ज्यूसपेक्षा साधे पाणीच अधिक आरोग्यदायी आहे. पण साधे पाणी पिणे फारसे आवडत नसेल तर?
तर त्यावरचा एक उपायही संशोधकांनी सुचविला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एका बाटलीत लिंबू वर्गातील कोणतेही म्हणजे संत्रे, मुसुंबे असे फळ अर्धे कापून बाटलीच्या तळात बसवा आणि वरून साधे शुद्ध पाणी ओता. हे तयार झालेले पेय फ्रूट वॉटर आरोग्यदायी आहेच पण फळाचा खरा स्वाद, गोडी त्यामुळे कायम राहते आणि पोषणमूल्येही वाया जात नाहीत.