कंगनाविरोधात जावेद अख्तर यांनी ठोकला मानहानीचा दावा


आपल्या वादग्रस्त वक्तव्य नेहमीच चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही केल्या कमी व्हायचे नावच घेत नाही. मागील महिन्यातच तिच्या विरोधात कर्नाटकमधील तुमकूर येथे एक आणि मुंबईत दोन तक्रारारी दाखल झाल्या होत्या. आता तिच्या विरोधात प्रसिद्ध गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. एका रिपोर्टनुसार, कंगनाच्या एका वक्तव्यावरून अख्तर यांनी हा दावा ठोकला आहे. कंगनाने दावा केला होता की, अख्तर यांनी घरी बोलवून धमकावत हृतिक रोशनला माफी मागण्यास सांगितले होते.

स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांच्याशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने लिहिले आहे की, कोणत्याही प्रकारची धमकी त्यांच्याकडून दिली गेली नव्हती. जावेद साहब स्वभावाने फार संवेदनशील आहेत. पण हे सगळे फार दिवसांपासून सुरू होते. आता जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. यात पुढे लिहिले आहे की, प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि जावेद साहब मोठ्या लढाईसाठी तयार आहेत. न्यायालयाबाहेर सेटलमेंट करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे आता कंगनाच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत.

कंगनाची बहीण आणि मॅनेजर रंगोली चंदेलने ८ महिन्यांआधी ट्विट करून जावेद अख्तर यांनी कंगनाला धमकावल्याचा आरोप केला होता. तिने लिहिले होते की, जावेद अख्तरजी यांनी घरी बोलवले आणि धमकी दिली की, हृतिक रोशनची माफी माग. तिच्यावर महेश भट्ट यांनीही चप्पल फेकली होती. कारण तिने त्यांच्या सुसाइड बॉम्बर चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. दरम्यान, रंगोलीचं हे ट्विट तेव्हा समोर आले होते जेव्हा जावेद अख्तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.