आठवीतील चिमुकलीची उद्धव ठाकरेंना दारूबंदीसाठी भावनिक साद


नागपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीतील आठवीतील विद्यार्थिनीने दारूबंदी कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत भावनिक साद घातली आहे. माझ्या तेजसदादाच्या गाडीला मद्यपी वाहन चालकाने धडक मारावी का? आणि आदित्यदादांना माझे बाबा झिंगून घरात यावे हे रुचेल का, असे प्रश्न करत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, अशी मागणी तिने केली आहे.

या जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन जिल्ह्यांतील दारूबंदी कायम ठेवावी की ठेवू नये यासंबंधी समिती स्थापण्यात आली. पण याविरोधात आदिवासींनी लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून दारूबंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच चंद्रपूरमधील आठवीच्या मुलीने पत्र लिहिले आहे.

निरपराध जनतेला मद्यपी वाहनचालकाने चिरडून जावे किंवा माझ्या तेजसदादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे आपण सर्व वंशज आहोत आणि कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून माँ जगदंबेची ओटी आम्ही कशी काय भरणार? माझे बांधव, माता-भगिनी आनंदाने, सुखाने नांदोत, अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारूबंदी उठवावी, हा आपल्या मंत्रिमहोदयांचा अनाठायी आग्रह का असावा? असा सवालही या आदिवासी मुलीने विचारला आहे.

१९६३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची गडचिरोलीतील गावागावांत आदिवासींनी परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन भेट घेतली होती. शरद पवारांना या वेळी त्यांनी दारूबंदीसाठी सहा वर्षे सुरू असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहोचवल्या होत्या, असेही या मुलीने पत्रात नमूद केले आहे.