रद्दीचा व्यवसाय

raddi
कदाचित लोकांचा विश्‍वास बसणार नाही, परंतु रद्दीचा व्यवसाय हा लाखो रुपयांच्या उलाढालीचा विषय आहे. याही व्यवसायात तरुणांना संधी आहे. चिंधी विकणे हा एक व्यवसाय असेल असेही कोणाला वाटणार नाही, परंतु तो फार मोठा व्यवसाय आहे. मोठ मोठ्या मुद्रणालयांमध्ये छपाई मशीन पुसण्यासाठी कॉटनची चिंधी लागते. काही काही मुद्रणालयात तर दररोज १० ते १५ किलो चिंधीची गरज असते जी म्हणावी त्या प्रमाणात उपलब्ध सुद्धा होत नाही. कोणी व्यवसायात शिरलेच तर त्याच्या चिंध्यांना उत्तम मागणी येऊ शकते.

व्यवसाय खूप आहेत पण आपण एक खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे की, आपण ज्या उद्योगांना बिनभांडवली उद्योग म्हणत आहोत त्याचे उद्योगाच्या क्षेत्रातील नाव सर्व्हिस इंडस्ट्री असे आहे. ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप प्रगती झालेली असते त्या देशात वरचेवर सर्व्हिस इंडस्ट्री वाढायला लागते. अमेरिकेसारख्या देशात लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के लोक शेती करतात. भारतात मात्र लोकसंख्येच्या ६० टक्के लोक शेती करतात. अमेरिकेत २० टक्के लोक हे उद्योगात आणि कारखान्यात गुंतलेले असतात. बरेच लोक वृद्ध असतात आणि लोकसंख्येच्या ५५ टक्के लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. शेतीत गुंतलेले पाच टक्के लोक आणि कारखानदारीत काम करणारे २० टक्के लोक यांच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे ते निरनिराळ्या प्रकारची कामे सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लोकांकडून करून घेत असतात. म्हणजे ज्या देशात उद्योगात मोठी उलाढाल होते आणि वेतन चांगले असते तिथे असे बिनभांडवली सेवा उद्योग चांगले चालत असतात.

या ठिकाणी उद्योगाचे तीन प्रकार लक्षात घेतले पाहिजे. पहिला प्रकार असतो कारखानदारीचा. म्हणजे काही तरी उत्पादन करण्याचा. अशा उद्योगाला भांडवल भरपूर लागते आणि फार मोठे उद्योगपतीच कारखानदारीमध्ये गुंतवणूक करत असतात. उत्पादित मालाच्या विक्रीची देशव्यापी व्यवस्था उभी करण्याची ताकद त्यांच्यात असते. नव्याने उद्योगात शिरणार्‍या लोकांनी कारखानदारीच्या वाट्याला जाऊ नये. दुसरा प्रकार असतो व्यापाराचा. या व्यापारात एखादी वस्तू ठोक स्वरूपात खरेदी करून ती किरकोळीने विकणे. हा व्यवहार गुंतलेला असतो. तोही पैशाशिवाय उभा रहात नाही. मात्र हे दोन प्रकार सोडून जे सगळे उद्योग असतात ते सेवा उद्योग किंवा सर्व्हिस इंडस्ट्री या प्रकारात मोडतात. नव उद्योजकांनी आणि ज्यांच्या घरी व्यापाराची, उद्योगाची परंपरा नाही त्यांनी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये शिरले पाहिजे, कारण तिथे जोखीम नसते, धोका नसतो, फायद्या-तोट्याचे चढ-उतार नसतात. अशा सर्व्हिस इंडस्ट्रीची निवड करताना ती शक्यतो बिनभांडवली असावी आणि असलेच तर त्याला कमी भांडवल लागावे याची दक्षता घेतली पाहिजे. या मार्गाने गेल्यास चाकरमानी वृत्तीचा मराठी माणूस स्वत:च्या पायावर उभा राहून उद्योजक होऊ शकेल अशी खात्री वाटते.

ब्लर्ब
महाराष्ट्रातल्या काही संस्थांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशिक्षणामुळे मराठी तरुण हळू हळू का होईना पण उद्योगाकडे वळायला लागला आहे. मात्र या तरुणांच्या मनामध्ये अजूनही गोंधळ आहे. एखादा उद्योग करायचाच झाला तर त्याला भांडवल कोठून आणावे आणि भांडवल गुंतवून उद्योग केल्यानंतर तोटा झाल्यास काय करावे, असे प्रश्‍न त्याला भंडावून सोडत आहेत. अशा तरुणांच्या मनातील उद्योगधंद्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. उद्योगधंद्याला भांडवल लागतेच हा गैरसमज आधी दूर झाला पाहिजे. म्हणूनच एक पैसाही गुंतवणूक न करता हजारो रुपये कमवून देणारे काही व्यवसाय या पुस्तकात दाखविण्यात आलेले आहेत. हे पुस्तक वाचून चाकरमान्या वृत्तीचा मराठी तरुण उद्योगधंद्याकडे वळेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Comment