प्रश्‍नांचे चिंतन करा

think
नोकरीसाठीचा इंटरव्ह्यू हे तसे कठीण कर्म असते. कारण इंटरव्ह्यू हा स्वत:च्या मार्केटिंगचा प्रकार असतो. आपले व्यक्तिमत्व आणि आपली क्षमता यांचे मार्केटिंग आपल्याला करायचे असते आणि तेही पूर्णपणे अनोळखी लोकांसमोर करायचे असते. त्यामुळे ते कठीण असते. परंतु आपण थोडे चिंतन केले तर हे मार्केटिंग सोपे जाऊ शकते. त्यासाठी काही सूचना आहेत. नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी काही ठराविकच प्रश्‍न विचारले जात असतात. त्यामुळे त्या प्रश्‍नांमध्ये अनपेक्षित काही नसते. म्हणून आपल्याला काय विचारले जाऊ शकेल याचा मनाशी आधी अंदाज बांधावा आणि तसा प्रश्‍न आल्यास आपण काय बोलले पाहिजे याचा विचार करून ठेवावा. अशा प्रकारच्या चिंतनातून नेमका शंभर टक्के अंदाज येईलच असे सांगता येत नाही. परंतु आपण योग्य उत्तराच्या जवळ जाऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला विचारले जाणारे प्रश्‍न हे त्या कंपनीच्या स्वरूपावरही अवलंबून असते. तेव्हा प्रश्‍नांचा अंदाज बांधताना कंपनी, तिचे उत्पादन आणि तिचा विस्तार या गोष्टीवर थोडे चिंतन करावे. काही वेळा इंटरव्ह्यूमध्येच उमेदवाराला कंपनीविषयी काय माहित आहे, असे विचारले जाते. तेव्हा या चिंतनाचा विचार होतो. तुम्ही रिझ्यूम पाठवताना प्रत्यक्ष इंटरव्ह्यूच्यावेळी काही कागदपत्र सादर करण्याचे आश्‍वासन दिलेले असते. ते रिझ्यूममध्ये नमूद केलेले असते. म्हणून ती कागदपत्रे घेऊन जाणे आपल्यावर बंधनकारक असते. इंटरव्ह्यूचा वेळ नीट लक्षात ठेवा. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये इंटरव्ह्यूची ठिकाणे सापडणे कठीण जाते, अशावेळी आधी जागा शोधलेली असावी. ऐनवेळी जागेची शोधाशोध करत बसलो आणि जागा न सापडल्यामुळे उशीर झाला तर ते चांगले दिसत नाही. इंटरव्ह्यू देताना गडबडून जाऊ नका, अती उत्तेजितही होऊ नका आणि चेहरा पाडूही नका. स्वत:विषयी माहिती सांगताना सगळीच माहिती सांगितली पाहिजे असे नाही. आपण त्या कंपनीत ज्या नोकरीसाठी आलो आहोत त्या नोकरीला कोणत्या पात्रतेची गरज आहे हे लक्षात घेऊन त्या पात्रतेविषयीची आपली माहिती जरूर सांगा. अनावश्यक माहिती सांगत बसू नका. लोकांच्या इंटरव्ह्यू मध्ये काही कॉमन चुका असतात. त्यांची माहिती नेहमी सांगितली जात असते. त्या चुका टाळा.

Leave a Comment