११ वी प्रवेश प्रक्रियेच्या मुद्यावरुन विद्यार्थी-पालक समन्वय समितीने घेतली राज ठाकरेंची भेट


मुंबई – जीम चालक, डब्बेवाले, मूर्तिकार आणि कोळी महिला यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज कृष्ण कुंजवर जाऊन भेट घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया मागच्या दोन महिन्यांपासून रखडल्याचा मुद्दा घेऊन समन्वय समितीने राज ठाकरेंची आज भेट घेतली. त्यांनी राज ठाकरेंशी अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल, यावर चर्चा केली. कारण प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार? त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचे काय होणार हा सुद्धा मुद्दा आहे.

फी वाढीचा काही पालकांचा सुद्धा मुद्दा होता. काही शाळांनी राज्य सरकारच्या जीआर नंतरही फी वाढ केल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस सुरु करावेत, या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसचे मालकही राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. एकूणच मागच्या काही महिन्यात राज ठाकरेंची समाजातील वेगवेगळया घटकांनी उद्योग-व्यवसाय सुरु करण्याची परवागनी मिळावी, यासाठी भेट घेतली आहे.