प्रधानमंत्री कन्या विवाह योजनेबद्दल व्हायरल मेसेजवर पीआयबीचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली: मोदी सरकारने कोरोना संकटकाळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना आणल्या. सरकारकडून आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजने’शी संबंधित हा मेसेज आहे.

केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजने’च्या माध्यमातून मुलींच्या लग्नासाठी ४० हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पण हा मेसेज खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दलची माहिती पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून दिली आहे. मुलींच्या लग्नासाठी सरकार पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचे पीआयबीने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. सरकारची सध्या अशी कोणतीही योजना नसल्याचे देखील पीआयबीने म्हटले आहे.


व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे. ‘प्रधानमंत्री कन्या विवाह योजने’च्या अंतर्गत केंद्र सरकार मुलींच्या विवाहासाठी ४० हजार रुपये देत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला. पण हा दावा फेक असल्याची माहिती पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने दिली आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारची कोणतीही योजना सुरू केली नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.