सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रिपद गेल्याचे १०० टक्के दु:ख – दीपक केसरकर


सिंधुदुर्ग: मला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली नाही याचे मला अजिबात दु:ख नाही. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मंत्रिपद गेल्याचे १०० टक्के दु:ख असल्याचे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये दीपक केसरकर यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी ही चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करू नये हा पूर्णपणे निर्णय पक्षप्रमुखांचा आहे. त्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्याचा प्रश्न नाही. काही ना काही लोक बोलत असतात. त्याला काही अर्थ नाही. मला मंत्री व्हायचे असते तर भाजपमध्ये त्याचवेळी गेलो असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातून मला बोलावण्यात आले होते. मला तेव्हाचे गोव्याचे मुख्यमंत्री घेऊन गेले होते. आज ते हयात नाहीत अन्यथा त्यांनी सांगितले असते, असा गौप्यस्फोटही केसरकर यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.

मला माझे मंत्रिपद गेल्याचे दु:ख नाही. पण जिल्ह्याचे मंत्रिपद गेल्याचे निश्चितच दु:ख आहे. माझ्या जागी वैभव नाईक यांना मंत्री केले असते तरी चालले असते. अगदी मला केले असते तरी मी तीन वर्षांनंतर पद सोडून नाईक यांना दिले असते. तसे वैभव नाईक यांना देखील मी बोललोही होतो. मंत्रिपदाला चिकटणारा माणूस मी नाही. मला मंत्रिपद मिळावे म्हणून मी कोणालाही भेटलेलो नाही. पक्षप्रमुखांनी त्यांच्या मर्जीनुसार काहीही करावे. त्यांचा तो अधिकार आहे. उलट उद्धवजी मुख्यमंत्री झाल्याचे आम्हाला समाधान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.