उद्यापासून होणाऱ्या या बदलांमुळे तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम


नवी दिल्ली – दररोजच्या गोष्टींचे नियमात उद्यापासून देशभरात बदल होणार आहे. त्यातील असे काही बदल आहेत, ज्याचा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत, जर त्या नियमांकडे तुम्ही दुर्लक्ष केले, तर नुकसान तुमचे होऊ शकते. १ नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून एलपीजी सिलिंडरपासून रेल्वेच्या टाइम टेबलपर्यंत सर्व गोष्टी बदलणार आहेत. त्याची माहिती आज आम्ही आमच्या वाचकांना देत आहोत.

एलपीजी सिलिंडरच्या वितरण नियमात १ नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून बदल होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून तेल कंपन्या डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) प्रणाली लागू करणार आहेत. म्हणजेच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर गॅस वितरणापूर्वी ओटीपी पाठविला जाईल. सिलिंडर जेव्हा आपल्या घरी येईल तेव्हा डिलिव्हरी बॉयबरोबर ओटीपी शेअर करावा लागेल. ओटीपी सिस्टम जेव्हा एकमेकांशी जुळेल तेव्हाच तुम्हाला सिलिंडर दिला जाणार आहे.

जर तुम्ही इंडेनचे ग्राहक असाल तर यापुढे तुम्ही जुन्या क्रमांकावर गॅस बुक करू शकणार नाही. आपल्या एलपीजी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर इंडेनने गॅस बुकिंगसाठी एक नवीन नंबर पाठविला आहे. इंडेन गॅसच्या ग्राहकांना आता एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी ७७१८९५५५५५ वर कॉल किंवा एसएमएस पाठवावा लागेल.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमती राज्यातील तेल कंपन्यांकडून ठरवल्या जातील. किंमती वाढू शकतात किंवा दिलासादेखील मिळू शकतो. अशा परिस्थितीत १ नोव्हेंबरला सिलिंडरच्या किंमती बदलण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडर्सच्या किंमतीत ऑक्टोबरमध्ये वाढ केली.

त्याचबरोबर भारतीय रेल्वे १ नोव्हेंबरपासून देशभरातील गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. १ नोव्हेंबरपासून गाड्यांचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १३ हजार प्रवासी आणि ७ हजार मालवाहतूक करणार्‍यां गाड्यांच्या वेळेत या निर्णयामुळे बदल करण्यात येणार आहेत. देशातील ३० राजधानी गाड्यांचे वेळापत्रकदेखील १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. त्याचबरोबर तेजस एक्स्प्रेस चंदीगड ते नवी दिल्ली दरम्यान धावेल आणि १ नोव्हेंबरपासून दर बुधवारी सुटेल.

एसबीआयचे काही महत्त्वपूर्ण नियम १ नोव्हेंबरपासून बदलणार आहेत. एसबीआय बचत खात्यांवर कमी व्याज मिळेल. आता बचत खात्यावर १ नोव्हेंबरपासून १ लाख रुपयांपर्यंत ०.२५ टक्के व्याजदर कमी करून ३.२५ टक्के केले जाईल. तर १ लाखाहून अधिक रकमेच्या ठेवींवर आता रेपो रेटनुसार व्याज मिळेल.