पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशावर संजय राऊतांचे सूचक वक्तव्य


पुणे – गेल्या आठवड्यात पक्षाला रामराम करत भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांच्या उपस्थितीत खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ मनगटावर बांधले. खडसेंनंतर आता पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पंकजा मुंडे यांना ऑफर देण्यात येत असल्याचा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुण्यात विचारण्यात आला.

पंकजा मुंडेंविषयी मला फार माहिती नाही. त्यांना आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिली नाही. अशाप्रकारची ऑफर त्यांना फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात, असे सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी आज पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालापाला संबोधित करताना तुफान फटकेबाजी केली. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना आपल्या शैलीत उत्तरे दिली.

पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला. संजय राऊत त्यावर बोलताना म्हणाले की, पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी आपले चांगले संबंध असल्यामुळे जर पक्षात पंकजा मुंडे यांना घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील. काही महिन्यांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्यामुळे त्यांनी पक्षापासून काहीसा दूरावा साधला होता. विधान परिषदेतह त्यांना डावलण्यात आल्यामुळेही त्यांची नाराजी दिसून आली होती. पण पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत काही दिवसांपूर्वी त्यांची वर्णी लागली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर कौतुक केले आहे. राष्ट्रीय नेते होण्याची देवेंद्र फडणवीस यांच्यात क्षमता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षाने पहिल्या दिवसापासून सरकारविरोधात घेतलेली भूमिका लोकशाहीत बसत नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून त्यांचा आम्ही कायम सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. ते ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यांनी त्यातून बाहेर पडून पुढील राजकारण केले पाहिजे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

पुणे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू राहिले आहे. जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. देशाचं आणि राज्याचे राजकारण अनेक काळ बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होते, बदलत होते. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी पुढे बोलताना महाविकास आघाडी सरकारला होणाऱ्या वर्षपूर्तीनिमित्त भाष्य केले.