गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर पलटवार


जळगाव : शुक्रवारी भाजपच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक काल पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एकनाथ खडसेच नव्हे तर मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या सात ते आठ नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा फरक पक्षाला पडला नव्हता. भाजपकडून मुख्यमंत्री पद भूषवल्यानंतर काही नेतेमंडळी पक्ष सोडून गेल्यानंतर ते पक्षात परत देखील आले होते. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नसून कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा हा पक्ष आहे.

खडसेंनी केलेल्या टीकेला यावेळी प्रत्युत्तर देताना त्यांनी जोरदार पलटवार केला. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खडसेंनी पक्षांतर केल्यानंतर जोरदार घडामोडी घडत आहेत. खडसे आणि महाजन यांच्यातही सध्या शाब्दिक युद्ध रंगले आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरात पुढच्या कालखंडात कोण किती सक्षम आहे, कुणाच्या मागे किती लोक आहेत, हे चित्र दिसेलच, असे म्हटले होते. गिरीश महाजन यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

महाजन पुढे म्हणाले, पक्षाच्या मागे कोण आहे, हे मानणारे आम्ही असल्यामुळे ते येत्या कालखंडात दिसेलच. भाजप हा पक्ष व्यक्तीनिर्भर नसून हा पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर चालणारा असल्यामुळे लोक याठिकाणी येतील आणि जातील. पण पक्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हे आपल्यालाही दिसत आहे. लोकसभा तसेच राज्यसभा मिळून आज 500 पेक्षा अधिक खासदार भाजपचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर, त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण भारतभर भाजपची घोडदौड वेगाने सुरू असल्यामुळे कोण काय म्हणते? याला फार काही महत्त्व देण्याची गरज नसल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

केंद्रीय नेतृत्त्वाकडून सध्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जनसंपर्क अभियान तसेच आत्मनिर्भर भारत असा कार्यक्रम आलेला आहे. आजची ही बैठक याबाबतीत चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती. येत्या 2 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात राज्य सरकारविरुद्ध जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. आज शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. कोणत्याही प्रकारचा निर्णय शेतमालाच्या खरेदीबाबत झालेला नाही. नोकरदार, विद्यार्थीवर्गाच्या अडचणी आहेत. भाजपकडून या साऱ्या विषयांबाबत सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.