भारत हल्ला करेल या भीतीपोटी झाली होती अभिनंदन यांची सुटका; पाकच्या माजी मंत्र्याचा खुलासा


नवी दिल्ली – भारताचा पाकिस्तानात असलेला दरारा पुन्हा एकदा दिसून आला आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका भारत हल्ला करेल या भीतीपोटीच करण्यात आल्याचा खुलासा पकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री ख्वाजा मोहम्मद असिफ यांनी केला आहे. असिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या वक्तव्यामुळे भारताचा दरारा आणि पाकिस्तानच्या मनात असलेली भीती स्पष्ट झाली आहे.

पाकिस्तानला वारंवार भारत हल्ला करेल ही चिंता सतावत होती. त्यांच्या मनात या हल्ल्याची भीती असल्यामुळे भारताला शांत करण्यासाठी अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात आल्याचे असिफ यांनी सांगितले. त्यावेळी भारताच्या हल्ल्याच्या असलेल्या भीतीबाबत पाकिस्तानच्या संसदेचे माजी अध्यक्ष अयाज सादिक यांनी माहिती दिली आहे.

तत्कालीन लष्करप्रमुख कमर बाजवा यांना भारत हल्ला करेल या भीतीने धडकी भरली होती. भीतीने त्यांचे पाय लटपटत होते. गाळण उडाल्याने चेहऱ्यावर घाम आला होता. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत असल्याचे सादिक यांनी सांगितले. अभिनंदनची सुटका केली नाही, तर भारत रात्री 9 वाजता हल्ला करेल अशी भीती होती. परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी त्या भीतीने थरथरत होते. अभिनंदनबाबत ते ‘खुदा के वास्ते उसे जाने दो’, असे बोलले. त्यातून त्यांना असलेली भारताच्या हल्ल्याची भीती दिसत होती.

पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये लढाऊ विमाने पाठवली होती. त्यांचा हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग 21 ने उड्डाण केले. पाकिस्तानच्या विमानांना परतवून लावत असताना पाकव्याप्त कश्मीरमध्ये त्यांचे विमान कोसळले आणि त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. भारताने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर दबाव टाकल्यानंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती. पाकिस्तानने त्यावेळी भारताच्या हल्ल्याच्या भीतीपोटी अभिनंदन यांची सुटका केल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारताचा असलेला दरारा आणि भीती पाकिस्तानच्या संसदेतच स्पष्ट झाली आहे. पाकिस्तानने त्यावेळी कितीही दर्पोक्ती केली असली, तरी तो मनातून घाबरलेला होता, हे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री आणि तत्कालीन लष्करप्रमुख यांची भीतीने गाळण उडाली होती, हे पाकिस्तानी संसदेत करण्यात आलेल्या खुलाशावरून स्पष्ट होते.