आपले सरकार कधी पडले हे उद्धव ठाकरेंना कळणार नाही – रामदास आठवले


मुंबई : २५-३० वर्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनच शिवसेनेशी भाजपची युती होती. मग, शिवसेनेचे हिंदुत्व आता अचानक वेगळे कसे बनले, असा प्रश्न उपस्थित करतानाच आम्ही राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही. पण, हे सरकार कधी पडले हे उद्धव ठाकरेंना देखील कळणार नाही, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे, वक्तव्य केले होते. पण त्यांच्या त्या वक्तव्याशी मी सहमत नाही. सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी असल्यामुळे एक दिवस भूकंप होईल, असे आठवले म्हणाले.

त्याचबरोबर आम्ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरच्या कंगनाच्या भूमिकेचा विरोधच केला. परंतु, तिला मुंबईत येऊ देणार नाही या घटनाविरोधी भूमिकेला आम्ही विरोध दर्शवत कंगनाला त्याबाबत पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे आज असते तर कंगना त्यांना भेटली असती तर ताबडतोब हा विषय मिटला असता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कंगनाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन विषय संपवावा, असे आवाहनही आठवले यांनी केले. जीएसटी कायदा रद्द करण्याची गरज नाही. यात नवीन काही करण्याची गरज नाही. जीएसटीचा पैसा मिळाला पाहिजे, या मताशी सहमत असून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आठवले म्हणाले.