संघ आणि भाजप माणुसकीविरहीत विचारधारेचे – प्रकाश आंबेडकर


अकोला : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी चौफेर टीका केली आहे. अकोला येथे अखिल भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित ऑनलाईन ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम यावेळी कोरोनामुळे सार्वजनिकपणे न घेता अकोला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी प्रतिकात्मक घेण्यात आला. प्रकाश आंबेडकरांचे या कार्यक्रमात मुंबईवरुन लाईव्ह भाषण झाले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दरवर्षी होणाऱ्या या सभेत आंबेडकर आपली राजकीय दिशा आणि विचार स्पष्ट करत असतात.

प्रकाश आंबेडकरांनी या भाषणात अनेक मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चौफेर टीका केली. कोरोनाची स्थिती देशात गंभीर होण्यासाठी पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचे आंबेडकर म्हणाले. स्वत:चा ‘टीआरपी’ वाढवण्यासाठी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना देशात आणत ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम केला. देशात येथूनच कोरोनाचा फैलाव व्हायला सुरुवात झाल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी नरेंद्र मोदींवर केला आहे. देशवासियांना कोरोनाची भीती मोदींनी दाखवली. कोरोनाशी लढायचे मोदींनी केलेले आवाहन ठीक होते. पण हे करताना सहा महिन्यांपेक्षा अधिक दीर्घकालीन लॉकडॉऊनची आवश्यकता होती का?, असा सवाल आंबेडकरांनी नरेंद्र मोदींना केला.

आंबेडकरांनी लॉकडॉऊन’चा धागा पकडत संघ-भाजपवरही जोरदार टीका केली. कोरोनानंतर लॉकडॉऊन लावल्याने लोकांचे होत हाल होते. संघप्रमुख डॉ. मोहन भागवतांनी असे होत असताना पंतप्रधानांना परिस्थितीची जाणीव करुन दिलीच नसल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. देशभरात लोकांचे हाल होत असताना बघ्याची भूमिका संघ आणि भाजपने घेतल्याचे आंबेडकर म्हणाले. माणसाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेमध्ये किंमत नाही. सोबतच आरएसएस-भाजपच्या शासनात माणूस आणि माणुसकीला किंमत नसल्याचा टोला यावेळी आंबेडकरांनी लगावला. लॉकडॉऊन’ काळात मोदींनी स्थलांतर करणाऱ्या मजुरांचे हाल थांबवण्यासाठी देशभरात ‘कम्युनिटी किचन’ची संकल्पना का राबविली नाही?, असा प्रश्नही आंबेडकरांनी केंद्र सरकारला विचारला.

केंद्राच्या तिन्ही कृषी विधेयकांवरही प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. या विधेयकात किमान आधारभूत मूल्याबाबत काहीच ठोस तरतूद नसल्याचे त्यांनी म्हटले. काही राज्यांनी या विधेयकाला टोकाचा विरोध केला आहे. कृषी विधेयकात संशोधन करणार पंजाब आणि कृषी विधेयक नाकारणाऱ्या राज्य सरकारांविरोधात 56 इंचांची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 356 वापरत बरखास्त करणार का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

अनेक महत्वाच्या क्षेत्राचे केंद्र सरकारने खाजगीकरण चालवल्याचे धोरण चुकीचे असल्याचे आंबेडकर म्हणाले. देशाची संपत्ती केंद्रातील कंगाल सरकार विकायला निघाल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकार हे खाजगीकरणाचे धोरण अंबानी, अदाणींसाठी राबवत असल्याचा त्यांनी आरोप केला. देशाची वाटचाल यामुळे ‘बनाना रिपब्लिक’कडे तर सुरु झाली नाही ना?, असा सवाल त्यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जीभ पून्हा घसरली. सोलापूरातील आपत्तीजनक वक्तव्याचा त्यांनी यावेळीच्या भाषणातही पुनरुच्चार केला आहे. दारुडा नवरा जसा कोणत्याही कारणासाठी बायकोला मारतो, पंतप्रधान मोदीही तसेच प्रत्येक गोष्टीसाठी जनतेला वेठीस धरीत असल्याचे आंबेडकर म्हणाले. पंतप्रधान मोदी या दारुड्या नवऱ्यासारखेच असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधानांची तुलना बायकोला मारणाऱ्या दारुड्या नवऱ्याशी केली आहे.

दुष्काळग्रस्तांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागते. आपादग्रस्तांना सरकारने मायेची सावली द्यावी, असे आंबेडकर भाषणाच्या शेवटी म्हणाले. राज्यातील सरकार तीन पायांचे असून सरकारचे तिन्ही पाय वेगवेगळे असल्याचा टोला त्यांनी लगावला. माणसाचे जीवन सामान्य कधी करणार हे सरकारने स्पष्ट करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण भाषणात केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केले. आपल्या 1 तास 48 सेकंदाच्या भाषणात फक्त शेवटचे तीन मिनिटे त्यांनी राज्य सरकारवर भाष्य केले. एरव्ही शरद पवार आणि काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी संपूर्ण भाषणात मोदी विरोधाच्या अजेंड्यावरचा फोकस हटू दिला नाही. आंबेडकरांनी या भूमिकेतून राज्य सरकारसह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला अनुल्लेखाने मारले की, त्यांच्याप्रती ते सहानुभूतीच्या भूमिकेत आहेत का?, याची चर्चा होत आहे.