बीड – माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह तीन आमदार, खासदार व इतर ५० अशा एकूण ५५ जणांविरोधात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मेळावा घेतल्याबद्दल अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंकजा मुंडेंनी संताप व्यक्त केला आहे. सावरगाव घाट येथे काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा घेतला. यावेळी, विविध मुद्द्यांवर भाष्य करताना, त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. पण त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर या मेळाव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना पंकजा मुंडे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा घेतला. पंकजा मुंडेंचा हा मेळावा ऑनलाईन होता, तरीही तेथे मुंडे समर्थकांनी गर्दी केल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासह माजी मंत्री आ. महादेव जानकर, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर व इतर ५० जणांवर अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, पंकजा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन नीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 26, 2020
अतिवृष्टी पाहणी केली, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, अनेक नेते दौऱ्यात अनेक जिल्ह्यात होते. परवानगी घेऊन दसऱ्याला भगवान बाबांच्या दर्शनासाठी गेले असता गुन्हा दाखल झाल्याची बातमी पहिली.. कार्यकर्त्यांच्या नंतर हे गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर… असे म्हणत पंकजा यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनी पाहणी दौऱ्यावेळी जिल्ह्यात दौरे केले, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे सूचवत, आपण परवानगी घेऊन मेळाव्याला गेल्यावरही गुन्हा दाखल केल्याने नाराजी व्यक्त केली आहे.