महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री करत आहेत देशाच्या विभाजनाचे काम – कंगना राणावत


मुंबई – पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विरोधकांना फैलावर घेतले होते. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करत मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतवरही उद्धव ठाकरेंनी शरसंधान केले होते. आता कंगना राणावतने उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही घराणेशाहीमधून आलेल नेतृत्व असल्याचा टोला कंगनाने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावला आहे.


मुख्यमंत्री, तुमच्याप्रमाणे माझ्या वडिलांच्या सत्तेवर आणि पैशावर मी मोठी झालेली नाही. जर घराणेशाहीचे प्रोडक्ट मला व्हायचे असते, तर मी हिमाचलमध्येच राहिली असते. एका प्रतिष्ठित कुटुंबातून मी येते. पण मला त्यांच्या मर्जीवर आणि संपत्तीवर राहण्याची इच्छा नव्हती. काही लोकांकडे स्वाभिमान आणि स्वत:ची संपत्ती असते, असे कंगणाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


कंगनाने दुसऱ्या ट्विटमध्ये मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही जाईल, असे देखील म्हटले आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देशाच्या विभाजनाचे काम करत असून महाराष्ट्राचे ठेकेदार त्यांना कोणी बनवले आहे. जनतेचे ते सेवक आहेत. त्यांच्या आधी दुसरे कोणीतरी होते. त्यांच्यानंतर दुसरे कोणीतरी जनतेची सेवा करेल. महाराष्ट्राचे मालक असल्यासारखे ते का वागत असल्याचे ट्विट कंगनाने केले होते.