आरक्षणाबाबत कंगनाचे मोठे वक्तव्य


मुंबईः आरक्षणाचा मुद्दा देशात अत्यंत संवेदनशील असा मुद्दा समजला जातो. या एकाच मुद्द्यावरून अनेक राज्य सरकारे पडतात आणि पुन्हा नव्याने स्थापन देखील केली जातात. मागील बऱ्याच काळापासून आरक्षण देण्यासाठी नक्की निकष कोणता असावा, यावर चर्चा सुरू आहे. आरक्षण जातीच्या आधारे द्यावे की माणसाची आर्थिक स्थिती लक्षात घेता आरक्षण द्यावे? या महत्त्वाच्या विषयावर आता अभिनेत्री कंगना राणावतने आपले मत मांडले आहे.


कंगनाने यावेळी गरिबीच्या आधारावर आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर जोर दिला आहे. नेहमी आरक्षण गरिबीच्या आधारवरच दिले पाहिजे, असे आपल्या ट्विटमध्ये कंगनाने स्पष्टपणे सांगितले. जातीच्या नावावर आरक्षण देणे, तिच्या दृष्टीने बरोबर नाही. नेहमीच आरक्षण गरिबीच्या आधारावर दिले जावे. आरक्षण जातीच्या नावावर असू नये. मला माहीत आहे की, सध्या राजपूत समाज खूप संकटात सापडला आहे, पण ब्राह्मणांची स्थिती पाहून तर खूप वाईट वाटत असल्याची भावना कंगनाने व्यक्त केली आहे.

आता आपल्या ट्विटमध्ये कंगना राणानतने दोन मोठ्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे. एकीकडे तिने गरिबीच्या जोरावर आरक्षण देण्याची वकिली केली आहे, तर दुसरीकडे ब्राह्मणांच्या स्थितीबद्दल तिने चिंता व्यक्त केली आहे. कंगनाने आपल्या ट्विटमध्ये ब्राह्मणांचा उल्लेख केला आहे. गरिबीच्या रेषेखाली 55 टक्के ब्राह्मण हेच आहेत. कंगनाने यापूर्वीही आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. तिच्या वक्तव्यांवरून प्रत्येक वेळी मोठा गदारोळ झाला आहे. सोशल मीडियावरून यावेळी सुद्धा तिच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काही जण कंगनाच्या विचारांशी सहमत आहेत, तर काही जणांनी तिच्यावर टीकासुद्धा केली आहे. आरक्षणाबद्दल तपशीलवार कंगनाने वाचले पाहिजे, असा सल्लाही काहींनी तिला दिला आहे.