हृदय विकार हा श्रीमंतांचा आजार आहे असे साधारणपणे मानले जाते. त्यामुळे भारत हा देश गरिबांचा असल्याने भारतात हृदय विकार असणार्यांची संख्या फार वाढण्याची शक्यता नाही असे वाटते. प्रत्यक्षात भारतात हृद्रोग्यांची संख्या तर मोठी आहेच पण ती जगात सर्वाधिक आहे. भारतातल्या चाळीशी ओलांडलेल्या अनेकांना हृदय रोगाचा उपद्रव कधीही होऊ शकतो. म्हणून भारतीयांनी हृदय विकाराच्या बाबतीत सावध राहिले पाहिजे.
प्रत्येकाला रुग्णालयात जाऊन हृदय विकाराची चाचणी करून घेणे शक्य होईलच असे नाही. त्यामुळे काही सामान्य लक्षणांच्या आधारावर आपण अशी चाचणी करून घेऊ शकतो. आपल्याला छातीत असह्य वेदना होत असतील आणि श्वास घ्यायला त्रास होत असेल, दीर्घ श्वास घेता येत नसेल तर ताबडतोब जाऊन चाचणी घेतली पाहिजे.
दगदगीमुळे गळून जाणे हे सुद्धा एक हृदय विकाराचे लक्षण असू शकते. छातीत होणार्या वेदना खांदे, मान आणि हात इकडे पसरायला लागल्या की सावध झाले पाहिजे आणि आपल्याला हृदय विकार आहे का, याची तपासणी करून घेतली पाहिजे.
उगाचच घाम येणे, विशेषत: तळहात घामेजून जाणे आणि चक्कर आल्यासारखे वाटणे ही सुद्धा हृदय विकाराची प्राथमिक लक्षणे समजावी. अपचन, हात दुखणे किंवा हात आखडणे, जबडा दुखणे या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करता कामा नये.