भाजपने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादीने ऑफर केली होती मला उमेदवारी – एकनाथ खडसे


जळगाव – भाजपने विधानसभा निवडणुकीच्या आधी माझे तिकिट कापले, रोहिणीताईंसाठी मी तिकिट मागितले नव्हते. पण त्यांना जाणीवपूर्वक तिकिट दिल्यानंतर भाजपमधीलच काही गद्दारांनी त्यांना पाडण्यासाठी काम केल्याचा आरोपही राष्ट्रवादीत दाखल झालेल्या एकनाथ खडसेंनी केले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे मुक्ताईनगरमध्ये बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मला माझे कार्यकर्ते कायमच पक्षांतर करा, असे सांगत होते. तुम्ही अन्याय सहन करु नका, तुमचा अपमान होतो आहे, तो तुम्ही सहन करु नका, असे मला कार्यकर्ते सांगत होते. पण मी चाळीस वर्षे पक्षात असल्यामुळे त्यामुळे पक्ष बदलण्याचा विचार देखील माझ्या मनात नव्हता. मंत्रिपदावरुन मला विनाकारण हटवण्यात आले. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या वेळी माझे तिकिट कापल्यानंतर राष्ट्रवादीने दोन दिवस मला विनंती केली होती की तुम्ही पक्षांतर करा, आम्ही तुम्हाला तिकिट देतो. पण ती ऑफर त्यावेळी मी नाकारल्याचेही खडसेंनी सांगितले.

रोहिणी खडसेंना तिकिट देणे ही देखील भाजपची खेळी होती. भाजपच्या गद्दार कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसेंना पाडण्यासाठी काम केले. त्यासंबंधीचे सर्व पुरावे (फोटो, ऑडिओ कॅसेट, सीडी) हे मी दहा महिन्यांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांना दिले होते. पण त्या कार्यकर्त्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. याचाच अर्थ कुणीतरी त्यांच्यामागे उभे होते हे उघड आहे. या गद्दारांवर कारवाई झाली असती तर मला बरे वाटले असते आणि नंतर हे प्रकार वाढलेही नसते. पण या लोकांना त्यांच्यावर कारवाई करायची नाही, हे स्पष्ट दिसत होते. मला तिकिट नाकारले तेव्हाच आपल्याकडे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आला होता. पण त्यावेळी पक्ष बदलणे मला योग्य वाटत नव्हते. पण देवेंद्र फडणवीस यांची मनमानी सुरु होती. मतदार, कार्यकर्ते सगळ्यांनाच हे वाटत होते की मी पक्ष सोडावा. आजही ८० टक्केंच्या वर लोक म्हणत आहेत नाथाभाऊंनी पक्ष सोडून योग्य निर्णय घेतला.

भाजपमध्ये सामूहिक नेतृत्व आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी प्रवृत्ती घुसली. हम करे सो कायदा, हे धोरण त्यांनी राबवले. रोहिणी खडसेंसाठी मी तिकिट मागितले नव्हते. ही खेळी विधानसभेच्या वेळेला करण्याची गरज नव्हती. माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अन्याय केल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला शरद पवारांनी प्रवेश दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, कारण माझे राजकीय पुनर्वसन त्यांनी केल्याचेही एकनाथ खडसेंनी म्हटले आहे.