आठ महिन्यानंतर वुहानला जाणार एअर इंडियाचे विमान

करोना उद्रेकानंतर चीनच्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची वंदे भारत फ्लाईट ३० ऑक्टोबर रोजी, आठ महिन्यांच्या काळानंतर पुन्हा एकदा वुहानला जाण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी फेब्रुवारी मध्ये भारताने वुहान येथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सहा विमाने पाठविली होती.

गतवर्षी डिसेंबर मध्ये करोनाचे प्रसार केंद्र बनलेल्या वुहान या चीनी शहरातून अनेक भारतीयांना आत्तापर्यंत परत आणले गेले आहे. मात्र भारतातही करोना उद्रेक झाल्यानंतर विमान सेवा स्थगित केली गेली होती. दरम्यान जुन मध्ये चीन सरकारने वुहान शहर पूर्णपणे करोना मुक्त झाल्याचे जाहीर करून शहरात लादले गेलेले सर्व निर्बंध हटविले आहेत.

बीजिंग मधील भारतीय दुतावासाने शुक्रवारी वंदे भारत मिशन अंतर्गत ३० ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून वुहान येथे एअर इंडियाची फ्लाईट येणार असल्याचे जाहीर केले आहे. या विमानातून मायदेशी येणाऱ्याना अगोदरच नोंदणी करायचे आवाहन केले गेले होते. परत भारतात येणारया सर्व प्रवाशांना दिल्लीत हॉटेल मध्ये १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे असे समजते.