अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात रंगले ट्विटर वॉर


मुंबई – अ‍ॅक्सिस बँकेतून एचडीएफसी बँकेत मुंबई पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यावरुन आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर रंगले आहे. अमृता फडणवीस यांनी प्रियंका चतुर्वेंदीवर दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील अशा शब्दात टीका केली आहे.

एका गोष्टीचा मला पुनरुच्चार करायचा असून फक्त बँक तंत्रज्ञान आणि सेवेच्या आधारावर अ‍ॅक्सिस बँकेत सरकारी विभागाकडून (आधीची यूटीआय बँक) पोलीस खात्यांचे संपादन करण्याचा निर्णय घेतला गेला होता. यासंबंधी २९ ऑक्टोबर २००५ रोजी शासन आदेश निघाला होता. घाणेरडे राजकारण प्रामाणिक आणि कणखर व्यक्तींना फसवू शकत नसल्याचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.

लवकरच अ‍ॅक्सिस बँकेतून ५० हजार मुंबई पोलिसांची पगार खाती हस्तांतरित करण्यात येतील. ज्या पद्धतीने मनमानी करुन या बँकेची करत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती रातोरात हस्तांतरित करण्यात आली होती, हे लक्षात घेता हा निर्णय आवश्यकच होता, असे ट्विट प्रियंका चतुर्वेदी यांनी केले आहे.


अमृता फडणवीस यांनी या ट्विटला उत्तर दिले आहे. अ‍ॅक्सिस बँक ही माझी घरगुती बँक नाही. देशातील खासगी क्षेत्रातील ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. त्यातील मी एक कर्मचारी असून १८ वर्षे बँकेसाठी काम केले आहे. हा प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम संधीसाधू दलबदलूंना कसे समजतील? २००५ मध्ये आधारित तंत्रज्ञान आणि सेवांनुसार ही खाती देण्यात आल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.