नाथाभाऊ ट्रोल; राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका


मुंबई – भाजप रामराम ठोकून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे सध्या सोशल मीडियात भलतेच ट्रोल होऊ लागले आहेत. कारण सोशल मीडियात एकनाथ खडसेंनी दिलेला राजीनामा व्हायरल होत असून हा राजीनामा फेटाळण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. एकनाथ खडसेंनी लिहिलेल्या २ ओळींच्या आपल्या राजीनाम्यात मराठी शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळून आल्यामुळे अनेकांनी खडसेंना ट्रोल केले आहे.

एकनाथ खडसेंनी आपला राजीनामा इंग्रजीत दिला असतात तर तो फक्त स्पेलिंगच्या चुकांसाठी गाजला असता, पण मराठीत शुद्धलेखन हे नेहमीच दुर्लक्षित केले जाते. पण खडसेंनी दिलेल्या २ ओळींच्या राजीनाम्यात किती चुका असाव्यात? असा प्रश्न संतप्त नेटकऱ्यांनी विचारला आहे. याबाबत सोशल मीडियात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी आवाज उठवल्यानंतर नेटकऱ्यांनी एकनाथ खडसेंना चांगलेच धारेवर धरले आहे.

खडसेंच्या राजीनाम्याचे पत्र सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर नेटकरी भाजप तसेच एकनाथ खडसेंची फिरकी घेत आहेत. या पत्राची केंद्र सरकारकडून बहुतेक सीबीआय चौकशी होणार, असे विनोद केले जात आहेत. तर मंत्रिपदावरील व्यक्ती ज्याला मराठी लिहिता येत नसेल तर मराठीत बोला सांगण्याचा आपल्याला हक्क आहे का? असा प्रश्न काहींनी विचारला आहे.