अखेर नाथाभाऊंचे सीमोउल्लंघन


मुंबई – भाजप रामराम ठोकून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी यांनी सीमोउल्लंघन करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. खडसे समर्थक कार्यकर्त्यांनीही यावेळी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रोहिणी खडसे यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचे पालन कुठेतरी कमी पडले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. असा बदल मागील ४-५ वर्षात झाला की पहिल्या रांगेत बसणाऱ्या नेत्याला मागच्या रांगेत बसावे लागले असे राजकारण झाले, जो अन्याय एकनाथ खडसेंवर झाला त्यावर सगळ्यात जास्त मीच बोललो असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सुडाचे राजकारण कधीही ऐकले किंवा पाहिले नव्हते. विरोधी पक्षात असला तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र यायचो. यशवंतराव चव्हाणांनी राज्यात सुसंस्कृत राजकारण करायचे शिकवले, पण मागच्या कालखंडात कुठेतरी राज्यातील राजकारण बदलले.

राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला, भलेभले नेते, ज्यांच्यावर शरद पवारांनी विश्वास ठेवला ती माणसे विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला सोडून दिली. पण शरद पवारांचे विचारच राज्याच्या राजकारणात जनता स्वीकारेल हा ठाम विश्वास आम्हाला होता. सगळ्यांसमोर विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अनेक घटना आहे. शरद पवार वयाच्या ७९ व्या वर्षीही राज्यभर फिरले, तरुण कार्यकर्ते खवळून उठला होता. सुडबुद्धीने शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली, त्यातून आताच्या सरकारचा पाया रचला गेल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.


तसेच आमच्या सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हीच आमची भूमिका आहे. पण केंद्राने अलीकडे कृषी क्षेत्राबद्दल जे कायदे केले, त्याबाबत स्पष्टता नाही, कामगार कायद्यात दुरुस्ती केली, ३०० पेक्षा कमी कामगार असले तर त्यांना कधीही काढले जाऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस उद्योगधार्जिणे केंद्र सरकारविरोधात ताकदीने विरोध करेल.

राष्ट्रवादी काँग्रेस यासगळ्या गोष्टीसाठी भक्कम उभे करणे आमचे काम आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करणारा पक्ष आहे. आमचा पक्ष लहान होता, पण हळूहळू शरद पवारांच्या नेतृत्वामुळे आणि स्वभावामुळे पक्षाची ताकद वाढली. राज्यात, देशात कुठेही संकट आले तर शरद पवारांकडे जनता अपेक्षेने बघते. आम्ही देशात आणि राज्यात शरद पवारांच्या जीवावर राजकारण करतो, शरद पवारांनी तरुणांना जास्त संधी दिली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांनी नव्या कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात काळात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी फक्त जळगाव जिल्ह्यात नव्हे तर राज्यभरात एकनाथ खडसे काम करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसेंनी अनेकांना गेल्या ४० वर्षापासून न्याय मिळवून दिला. विकासाची दृष्टी असणारे, प्रशासनावर वचक असणारा नेता राष्ट्रवादीत आला त्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकनाथ खडसेंच्या माध्यमातून बळ मिळेल. जळगाव जिल्ह्यातून किमान ५-६ आमदार एकनाथ खडसेंमुळे निवडून येतील असा विश्वास माजी प्रदेशाध्यक्ष अरूण गुजराथी यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसे यांच्या सोबत नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, बोदवडचे कृउबा सभापती निवृत्ती पाटील, मुक्ताईनगरचे सभापती प्रल्हाद जंगले, बोदवडचे सभापती किशोर गायकवाड, भुसावळच्या सभापती मनिषा पाटील, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सदस्य कैलास सुर्यवंशी, जळगाव जिल्हा दूध फेडरेशनचे अध्यक्षा मंदा खडसे, मुक्ताई सहकारी सुतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माळी,औरंगाबादचे माजी महापौर सुदाम सोनवणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.