खडसेंच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशावर रामदास आठवलेंनी सांगितली ‘मन की बात’


पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर बुधवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर राजकीय वर्तुळात बराच वेळ त्याचे पडसाद उमटत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी यामध्ये आघाडीवर आहे. त्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आता भर पडली आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी का दिली यावर भाष्य करतानाच त्यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामागची ‘राज की बात’ देखील सांगितली आहे.

गुरुवारी बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी पाहणी दौरा केला. ते यावेळी पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी यावेळी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. आठवले म्हणाले, सध्या एकनाथ खडसे यांच्याकडे आमदारकी नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते जात आहेत. त्यांना आमदारकीसह मंत्रिपद तेथे मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये न जाता ते आरपीआयमध्ये येतील अशी अपेक्षा होती. पण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५-१६ आमदार जातील, अशी कोणतीही शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आठवले यांनी या पाहणी दौऱ्यावेळी पुरग्रस्तांना राज्य सरकारने तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडुन मदतीसाठी पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्राकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.

अतिवृष्टीमुळे राज्यातील सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. केंद्राची मदत त्यासाठी मिळवू. पण यात राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे रामदास आठवले यांनी व्यक्त केली. कऱ्हा वागज येथील नदीवरील पूल प्रचंड पावसाने वाहून गेला आहे. पावसाचे पाणी दलितवस्तीमध्ये घुसल्याने नुकसान झाले. त्याचे लवकरात लवकर पंचनामे होणे आवश्यक आहे.