पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्यामुळे नोंदवला गेला खटला; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल


मुंबई – राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून भाजप सदस्यत्वाचा एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर पत्रकार परिषदेत सल बोलून दाखवली.

जयंत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती दिल्यानंतर माध्यमांशी एकनाथ खडसे यांनी संवाद साधला. खडसे यावेळी बोलताना म्हणाले, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते. आजतागातयत त्यांच्यासोबत भाजपचे काम केले. मला अनेक मोठी पदे भाजपने दिली, मी ती नाकारु शकत नाही. भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर मी टीका केली नाही. एकही आमदार, एकही खासदार माझ्यासोबत नाही. रक्षा खडसे भाजप सोडणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे आणि त्या त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याचे खडसे म्हणाले.

भाजप सोडताना खंत आहे, पण पक्षातून मला ढकलून लावले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला एका महिलेला सांगितला, फडणवीसांनी मला मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडले ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्यामुळे खटला नोंदवला गेल्याची टीका एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

कोणतेही आश्वासन मला राष्ट्रवादीने दिले नाही. राष्ट्रवादीच मंत्रिपदाबाबत सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदे मिळवली आहेत. सहकारातून मिळवले आहे. माझ्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत झालेला एक आरोप सांगा, पण नाईलाजास्तव मला भाजपचा त्याग करावा लागत असल्याचेही खडसे म्हणाले.