आजपासून ३० नोव्हेंबरपर्यंत धावणार ३९२ विशेष ट्रेन्स


नवी दिल्ली – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार आजपासून ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स धावणार आहेत. सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची काही दिवसांअगोदरच रेल्वेकडून घोषणा करण्यात आली होती. शिवाय, फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे या ट्रेनना नाव देखील देण्यात आले आहे. या ट्रेन्स २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत.

यासंदर्भात रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने या ट्रेन धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील. तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते. त्यानुसार ३९२ विेशेष ट्रेन्स आता चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्सची यादी देखील रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांसाठी नियमावली देखील रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्यानुसार, प्रवाशांना मास्क न घालणे, सोशल डिस्टसिंगचे न पालन करणे महागात पडू शकते. कोरोना संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन न केल्यास रेल्वेकडून दंड आकारला जाऊ शकतो. या विशेष ट्रेन्स नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छठ पुजा इत्यादी सणांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार चालवल्या जात आहेत. या ट्रेन्ससाठी अन्य विशेष ट्रेनप्रमाणे भाडे आकारले जाईल, म्हणजे याचे तिकाटाचे दर मेल व एक्स्प्रेस ट्रेन्सच्या तुलनेत १० ते ३० टक्के अधिक असतील. जे प्रवासावर अवलंबून असेल.