माझ्या ‘घटना बदल’ वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास – छत्रपती संभाजीराजे


मुंबई – मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी छत्रपती संभाजीराजेंनी दर्शवली असून केंद्र सरकारची मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी काही मुव्हमेंट असेल, उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू असल्याचे संभाजीराजेंनी म्हटल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर, या वक्तव्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संभाजीराजेंनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. तसेच, घटनादुरुस्ती असे मला म्हणायचे होते, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

सध्या राज्यातील राजकारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापले आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी तुळजापुरातून सुरुवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर या मोर्चात सहभागी झाले होते. त्यावेळी संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल करताना आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत असल्याचे म्हटले आहे. आता, केंद्र सरकारच्या मुव्हमेंटने गरज पडल्यास घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले होते. संभाजीराजेंना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले असताना, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारले होते. पण तसे मला म्हणायचे नव्हते, असे स्पष्टीकरण संभाजीराजेंनी दिले आहे.


माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याच्या बातम्या मला दिसत आहेत, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार असे वाक्य मला बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, माझी मूळ भावना समजून न घेता, पत्रकारांनी चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. संसदेत मराठा आरक्षणाबाबत घटनादुरुस्ती हाही पर्याय होऊ शकतो, असे विद्वान सांगत आहेत आणि त्याचा मी अभ्यास करुन पावले उचलणार असल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले.