नासलेली पिके घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शेतकरी


सोलापूर: अतिवृष्टग्रस्त सोलापूरच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून अतिवृष्टीने पिचलेल्या शेतकऱ्यांनीही मुख्यमंत्री येणार म्हणून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धाव घेतली. शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर आणि कांद्याची नासलेली पिके घेऊनच मुख्यमंत्र्यांची भेट घेत बोरी नदीवरील पुलावरून आमची विचारपूस काय करता? आमच्या शेतात, वस्तीत येऊन पाहणी करा, अशी सवालवजा विनंतीही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

आज सकाळीच सोलापूर येथील सांगवी खुर्दला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पोहोचले. या भागात पाऊस झाल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर न जाण्याचा सल्ला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना देत बोरी नदीवरील पुलावरच शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकण्याचा सल्ला दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुलावरूनच शेतकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री भेटायला येणार म्हणून शेतकऱ्यांनी आधी त्यांना पुलावर भेटण्यास नकार देत नुकसान झालेल्या ठिकाणी भेटायला येण्याची मागणी केली. पण मुख्यमंत्री न आल्याने नासलेली पिके घेऊन शेतकरी सांगवी पुलावर गेले. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथेही शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची केवळ दहाच शेतकऱ्यांना परवानगी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी उद्ध्वस्त झालेली पिके दाखवत पुलावरून विचारपूस काय करता? जिथे आमचे नुकसान झाले तिथे येऊन पाहणी करा, अशी विनंती केली.

शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांनीही विचारपूस केली. त्यांची निवेदने स्वीकारली आणि नुकसानीची माहिती घेतली. तसेच पंचनामे सुरू झाले आहेत का? स्थानिक पातळीवर मदत मिळाली का? याची माहिती देतानाच तुमच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. काळजी करू नका, असा धीरही शेतकऱ्यांना त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी कृषी मंत्री दादा भुसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह स्थानिक आमदारही उपस्थित होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.