नवी दिल्ली – समुपदेशन आणि योग्य वेळी होणारा संवाद यातून आत्महत्या टाळता येतील असा विश्वास मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या जगामध्ये सोशल मीडियाच्या फायद्या तोट्याविषयी खूप चर्चा होत आहे. परंतु सोशन मीडियाच्या माध्यमातूनसुध्दा आत्महत्या टाळण्याचे काम करता येऊ शकेल असे तज्ञांचे मत आहे. आत्महत्या करण्याची प्रवृत्ती हा मनाचा रोग आहे. योग्य वेळी हस्तक्षेप केल्यास ही प्रवृत्ती नष्ट करता येते असे अनेकवेळा दिसून आले आहे.
एखाद्या व्यक्तीला आत्महत्या कराविशी वाटते ही तात्पुरती लहर असते. रागाच्या, निराशेच्या किंवा वैफल्याच्या एका विशिष्ट क्षणाला माणूस या आजाराच्या आहारी जातो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्यातून जे लोक वाचतात ते ही गोष्ट मान्य करतात की आत्महत्या करण्याची प्रबळ इच्छा होण्याचा तो क्षण सर्वात महत्त्वाचा असतो. त्या क्षणाला मन आवरले गेले तर आत्महत्या करण्याची इच्छा होत नाही. पण त्या क्षणाला कोणीतरी सावरले तर आत्महत्या टळू शकते.
आत्महत्या करण्याची इच्छा असणारे काही लोक आता सरळ आपल्या भावना ट्वीटरवरून व्यक्त करायला लागले आहेत. आपले नातेवाईक किंवा मित्र यांच्याशी संवाद साधून आपल्या मनातली निराशा ते व्यक्त करत आहेत. त्यातल्या एखाद्या व्यक्तीला या मानसिक आजारी माणसाच्या मनातल्या भावना कळल्या आणि तो आत्महत्येच्या मार्गावरून चालला आहे हे लक्षात आले तर तो त्याची समजूत घालू शकतो आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त करू शकतो.