उद्धव ठाकरे हे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री: नारायण राणे


सिंधुदुर्ग: महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी उद्धव ठाकरे हे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असल्याची टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे. राज्याच्या परिस्थितीबद्दलचा उद्धव ठाकरे यांचा अभ्यास शून्य असून अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करुन ते काय साधणार असल्याचा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.

सोमवारी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत. रविवारी सिंधुदुर्गात प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे हे राज्यातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री आहेत. कोरोनामुळे एवढ्या लोकांचा बळी जात असताना आणि राज्यात पुराचा कहर सुरु असताना मुख्यमंत्री घरात बसून होते. सोलापूरच्या दौऱ्यावर आता ते जाणार आहेत. पण आता वेळ उलटून गेली आहे. राज्याच्या परिस्थितीबद्दलचा मुख्यमंत्र्यांचा अभ्यास शून्य असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.