दिलासादायक बातमी; कोरोना फेब्रुवारी २०२१ पर्यंत येणार संपुष्टात


नवी दिल्ली : केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेल्या एका सरकारी समितीने भारतातील कोरोना प्रादुर्भावाने आपला सर्वोच्च टप्पा पार केल्याचा दावा केला असून समितीने केलेल्या दाव्यानुसार, कोरोना संक्रमण फेब्रुवारी २०२१ पर्यंत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी सहा लाखांहून पुढे जाणार नाही, असा अंदाजही या समितीने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ७५ लाखांच्या जवळपास भारतातील कोरोना संक्रमितांची संख्या पोहचली आहे. यापुढे देखील व्हायरसपाचून बचावासाठी करण्यात येणारे उपाय सुरूच ठेवायला हवेत, असा सल्ला देखील या समितीने दिला आहे.

या समितीचे गठण कोरोना स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजयराघवन यांच्याकडून करण्यात आले होते. या समितीचे आयआयटी हैदराबादचे प्रोफेसर एम विद्यासागर हे प्रमुख आहेत. समितीच्या म्हणण्यानुसार, मार्च महिन्यात भारताने लॉकडाऊन घोषित केला नसता तर देशभरात २५ लाखांहून अधिक मृत्यू झाले असते. अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात आतापर्यंत १.१४ लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोना प्रतिबंधक लस सर्वांना वेगाने उपलब्ध होईल अशा व्यवस्थेवर काम करण्याच्या सूचना दिल्या. लस वितरणाचे नियोजन करताना देशाची भौगोलिक रचना आणि विविधता लक्षात घेण्याचे आदेशही मोदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शनिवारी कोविड-१९वरील प्रतिबंधात्मक लशीच्या उपलब्धतेचा आणि तिच्या वितरण व्यवस्थेच्या नियोजनाचा पंतप्रधान मोदी यांनी बैठकीत आढावा घेतला. लशीच्या वितरणावरच केंद्रीत ही बैठक होती. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते. सरकारकडून बैठकीनंतर एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

मोदी यांनी या बैठकीत लस उपलब्ध होताच प्रक्रियेच्या प्रत्येक पावलावर काटेकोरपणे चाचणी करण्याचे आदेश दिले. लशीचे डोस थंड वातावरणात ठेवणे, लशीकरण केंद्रांमधील यंत्रणेवर लक्ष ठेवणे, सीरिंजसारख्या वस्तूंची तयारी आणि साठा करणे यासारख्या प्रक्रियेकडे काटेकोरपणे लक्ष देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.