अजित पवारांनी दिले महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश


पुणे – कोरोनाबाधित रुग्णांना ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत लाभ देण्यास पुणे जिल्ह्यातील काही रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान अजित पवार यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही दिल्या. पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोविड-१९ ‘ विषाणू प्रादुर्भाव निमूर्लन आढावा बैठक पार पडली.

दरम्यान महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर जिल्ह्यातील काही रुग्णालये असून ती रुग्णालये पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. केंद्रीय पथकाच्या इशाऱ्यानुसार कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासनाने सतर्क राहून कोरोना विषाणूचा संक्रमण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही राज्यव्यापी मोहिम हाती घेतलेली आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने या मोहिमेचा दुसरा टप्पा अधिक प्रभावीपणे राबवा. मृत्यदर कमी करण्याबाबत सूक्ष्म नियोजन करुन मृत्यदर शुन्यावर आणण्यासाठी प्रयत्न करावे, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाच्या काळात नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोना विषाणूचे संसर्ग वाढण्याची शक्यता विचारात घेवून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

दरम्यान ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत तसेच राज्य शासनाने ग्रंथालय सुरु केल्याबद्दल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. नॉन-कोविड रुग्णालयातील खाटांबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन द्यावी, स्थानिक आकाशवाणी केंद्र तसेच समाज माध्यमातून मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी, सणाच्या काळात नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचे गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे इत्यादी जीवनावश्यक वस्तू रास्त दरात मिळण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.

कोरोना स्थिती, उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असून लोकशिक्षण,जनजागृतीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगितले. कोरोनाबाधित रुग्णाच्या होणार्‍या मृत्यूबाबत विश्लेषण करण्याबरोबरच सूक्ष्म नियोजन करुन मृत्युदर शुन्यावर आणणे, कोरोना विषाणूचा संसर्ग पसरणार नाही, यावर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सांगितले.