भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या खुशबू सुंदर यांनी मागितली काँग्रेसची माफी


नवी दिल्ली – नुकताच काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या खुशबू सुंदर यांनी प्रवेश केला आहे. दरम्यान खुशबू सुंदर यांच्यावर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच माफी मागण्याची वेळ आली. खुशबू सुंदर यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसवर टीका करताना मानसिक संतुलन ढासळलेल्यांचा पक्ष असल्याचे म्हटले होते. खुशबू सुंदर यांनी आपल्या या वक्तव्यावरुन माफी मागितली आहे. त्यांनी अयोग्य शब्दांचा वापर केल्याप्रकरणी फक्त माफी मागितलेली नसून भविष्यात पुन्हा असे होणार नाही, अशी हमी दिली आहे.

तामिळनाडूमधील जवळपास ३० पोलीस स्थानकांमध्ये खुशबू सुंदर यांच्या वक्तव्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. भाजपमध्ये खुशबू सुंदर यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी चेन्नईमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस पक्ष सोडल्याने टीका करणाऱ्यांना उत्तर देताना यावेळी खुशबू यांनी म्हटले होते की, मागील सहा वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये होते. पक्षासाठी मी खूप कष्ट घेतले आहेत. पण पक्ष सोडल्यानंतर मला तो मानसिक संतुलन बिघडलेल्यांचा पक्ष असल्याचे जाणवले.

त्यानंतर आता माफी मागणारे निवेदन खुशबू सुंदर यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यांनी यामध्ये आपण घाईघाईत वापरण्यात आलेल्या शब्दांबद्दल माफी मागितली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपण वापरलेले शब्द चुकीचे असल्याचे मान्य केले आहे. माझ्या कुटुंबातील काही सदस्य तसेच मित्रही मानसिक तणावाशी झगडत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच यापुढे कोणत्याही कारणास्तव पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये, याची आपण खात्री बाळगू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.

दिव्यांगांसाठी काम करणाऱ्यांनी खुशबू यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. काँग्रेसवर टीका करताना खुशबू यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याचा आरोप दिव्यांगासाठी काम करणाऱ्या दिपकनाथन यांनी केला होता. काँग्रेसवर टीका करताना दिव्यांगांशी तुलना करणे चुकीचे आहे. तुम्ही त्यांची तुलना का करता? तुमच्यासारखेच ते ही नाहीत का?, असा सवाल दिपकनाथन यांनी उपस्थित केला होता. मानसिक आजार असणाऱ्यांना खुशबू सुंदर यांनी महत्व दिले जावे आणि त्यांचा आवाज ऐकला जावा, असे सांगताना आपणही त्यासाठी समर्पित असल्याचे म्हटले आहे.