बिहार विधानसभा निवडणूक; मोदींचे भाषण घराघरात पोहचवणार चार लाख ‘स्मार्टफोन वॉरिअर्स’, १० हजार ‘सोशल मीडिया कंमाडोज’


नवी दिल्ली – अवघ्या काही दिवसांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारावर भर दिला जात आहे. त्यातच भाजपने बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ८ सभांचे आयोजन केले आहे. मोदींच्या सभा या व्हर्च्युअल होणार असून, त्यासाठी पक्षाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. स्मार्ट फोनसह पक्षाचे चार लाख कार्यकर्ते आणि १० हजार सोशल मीडिया कंमाडोज मोदींचे भाषण घराघरात पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कमीत कमी आठ रॅलीचे नियोजन सुरू असून या रॅली १५ ऑक्टोबरनंतर आयोजित केल्या जाणार आहेत. पण ही संख्या एका डझनपर्यंत जाऊ शकते. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी न झाल्यामुळे रॅली आयोजित करतात येत नसल्यामुळे पंतप्रधानांचा संदेश पोहोचवण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागला, असे म्हटले जात आहे.

बिहारच्या कानाकोपऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषण पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया कंमाडोज आणि चार लाख स्मार्टफोन वॉरिअर्सवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. या सभा ते लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. यावर भाजपचे नेते म्हणाले, देशातील जनता भारत-चीन सीमेवरील तणाव आणि आर्थिक मंदीमुळे लोक चिंतेत आहे आणि तशा प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागल्या असल्यामुळे थेट मतदारांपर्यंत पंतप्रधान मोदी यांना पोहोचणे महत्त्वाचे आहे. याविषयावर बोलणारे पंतप्रधान सर्वात विश्वासार्ह नेते आहेत. केंद्र सरकारच्या कार्यक्रमाबद्दलही ते बोलणार आहेत. थेट लाभहस्तांतरणातंर्गत असणाऱ्या योजनांचे लाभार्थी बिहारमधील असल्याचे ते म्हणाले.

२८ ऑक्टोबरला बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.