भारत बायोटेकने ‘कोव्हॅक्सीन’ संदर्भात घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय


नवी दिल्ली – भारत बायोटेकदेखील कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या कंपन्यामध्ये आघाडीवर आहे. पण भारत बायोटेकने नुकताच ‘कोव्हॅक्सीन’ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, याआधी ७५० स्वयंसेवकांवर कंपनी चाचणी करणार होती, पण आता फक्त ३८० स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. याशिवाय चाचणी घेतली जाणाऱ्या साइट्सची संख्याही कमी करण्यात आली आहे.

हा निर्णय पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांमधील सेरोकोव्हर्जन किंवा इम्यूनोजेनिसिटीच्या आधारे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. ३७५ निरोगी स्वयंसेवकांना पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला होता. त्यानंतर या स्वयंसेवकांना डोस देण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील चाचणीची प्रक्रिया सुरु होती. ताप आणि शारिरीक वेदना याशिवाय इतर कोणताही मोठा त्रास स्वयंसेवकांना जाणवला नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन ही एक 2-डोसची लस असून ती १४ दिवसांच्या अंतराने दिली जाण्याची योजना आहे. दरम्यान अद्याप पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील डेटा प्रसिद्ध किंवा सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसरा टप्पा चाचणी संख्या कमी केल्यामुळे लवकर संपेल आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यामुळे कोव्हॅक्सिनच्या चाचणीचा कालावधीदेखील कमी होईल. सध्या भारतात तीन लस वैद्यकीय टप्प्यात असून प्राथमिक निष्कर्ष हाती येण्यामध्ये जानेवारी उजाडेल आणि अंतिम निकाल मार्चच्या अखेर हाती येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होण्याचा वेग कालावधी कमी केल्यामुळे वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोव्हॅक्सीन लसीची निर्मिती भारत बायोटेक इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) सोबत मिळून करत आहे.