समुपदेशनाची गरज


दहावी-बारावी नंतर काय, असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडलेला असतो. मात्र आपल्या भावी आयुष्याचा हा प्रश्‍न सोडवताना बहुसंख्य विद्यार्थी आणि त्यांचे पालक फार उदासीन असतात. आपल्या मुलाने अमुक एक करिअरच करावे, असा बर्‍याच पालकांचा अट्टाहास असतो. विशेषत: अशिक्षित आणि गरीब पालकांत ही प्रवृत्ती दिसते. फार मोठा पगार देणारी नोकरी मिळवून देईल असे शिक्षण घ्यायचे झाले तर शिक्षणासाठी फार मोठा खर्चही करावा लागतो. तेव्हा तशा शिक्षणाच्या फार भानगडीत न पडता आपल्याला जमेल ते शिक्षण घ्यावे असा सरधोपट विचार हे पालक करत असतात. अशा पालकांना खरे म्हणजे समुपदेशनाची फार गरज असते. कारण आपल्या जवळ पैसा नाही याचा अर्थ मुलाचे चांगले करिअर घडूच शकत नाही असा होत नाही. पैसा न खर्चताही चांगले करिअर घडवता येते. मात्र, त्यासाठी व्यवसाय मार्गदर्शन करणार्‍या संस्था किंवा व्यक्तींकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.

एका बाजूला ही उदासीन प्रवृत्ती आहे तर दुसर्‍या बाजूला आपल्या मुलांच्या करिअरच्या बाबतीत फाजील दक्ष असलेले लोक आहेत. आपल्या मुलाने इंजिनिअर किंवा डॉक्टर झालेच पाहिजे असा अट्टाहास या वर्गातले पालक करत असतात. डॉक्टर किंवा इंजिनिअर यांना मिळणारा मानमरातब आणि पैसा यातूनच हा अट्टाहास निर्माण झालेला असतो. मात्र मुलांची अभ्यासातली झेप आणि विशिष्ट गुण मिळविण्याची कुवत, त्याचबरोबर त्यांची आवड-निवड याचा कसलाही विचार न करता हे पालक या मुलांवर ही महत्वाकांक्षा लादत असतात. अशी मुले पालकांच्या महत्वाकांक्षांचे ओझे वाहून, दमून, थकून वाकून जातात. त्यामुळे अलीकडच्या काळात मुलांचा विचार घेतला पाहिजे, त्याची आवड-निवड समजून घेतली पाहिजे आणि त्याच्या मनात असेल तोच अभ्यासक्रम त्याला दिला पाहिजे हा विचार समोर आला आहे आणि काही पालक तसे करतही आहेत.

पालकांनी सर्वस्वी आपल्या कलाने मुलाच्या भवितव्याचा निर्णय घेऊ नये हे तर खरे आहेच. पण मुलांत सुद्धा आपल्या भवितव्याचा निर्णय घेण्याची कुवत असतेच असे नाही. आवडी ही गोष्ट वेगळी आहे आणि व्यवसायाची निवड केवळ आवडीच्या आधारावर करता येत नसते हे लक्षात घेतले पाहिजे. काही वेळा मुले-मुली आपल्या मित्र-मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार उच्च शिक्षणाची निवड करत असतात, तर काही वेळा भावनांच्या आहारी जाऊन आणि कसल्या तरी क्षणिक आकर्षणापोटी, आता हाच आपला व्यवसाय असा निर्णय घेत असतात. तेव्हा त्याच्या आवडी-निवडी, कुवत यांचा विचार करून मनाचा कल ओळखून व्यवसाय मार्गदर्शक योग्य ते मार्गदर्शन करत असतात. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय पालकांची हौस, विद्यार्थ्यांचा कल आणि कुवत तसेच व्यवसाय मार्गदर्शकाचे मार्गदर्शन या तीन गोष्टींच्या आधारे घेतला पाहिजे.

Leave a Comment