सकल मराठा समाजाचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे – संभाजीराजे


सोलापूर: मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे नुसते राज्यकर्त्यांनी बोलण्यापेक्षा या सगळ्याला दिशा द्यावी. नंतर जे राजकारण तुम्हाला करायचेय ते करत बसा, अशा शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी महाविकासआघाडी सरकारला फटकारले. त्याचबरोबर आता महाराष्ट्रात सकल मराठा समाजाचा आवाज घुमायला पाहिजे आणि तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

छत्रपती संभाजीराजे शुक्रवारी सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात बोलेत होते. आरक्षणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांवर यावेळी त्यांनी टीकास्त्र सोडले. केंद्र आणि राज्य सरकारला मराठा आरक्षणाची कोणतीही पर्वा नसल्याचे म्हटले. आरक्षण सोडा पण सरकारने 2014 पासून आजपर्यंत मराठा समाजाचे बाकीचे प्रश्न तरी सोडावले आहेत का? महाराष्ट्रात ३२ टक्के मराठा समाजाची लोकसंख्या आहे. मग त्यांना मदत का केली गेली नाही? मराठा समाजातील तरुणांना घडवणाऱ्या सारथी संस्थेची स्वायत्तता मोडीत काढण्यात आली? नुसता जीआर काढून किंवा महामंडळांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करून काही होत नसल्याचा टोलाही संभाजीराजे यांनी सरकारला लगावला.

तसेच कोणत्याही पक्षाशी मला काही देणेघेणे नाही, राष्ट्रपतीनियुक्त खासदार मी आहे. मी याच गोष्टी गेल्या सरकारच्या काळापासून बोलत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाने आता सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मराठा समाजाला मागच्या आणि आताच्या सरकारने जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.