आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता – शक्तिकांत दास


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जीडीपीमध्ये ९.५ टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती माध्यमांशी संवाद साधताना दिली.

दरम्यान, कोणतेही बदल रेपो दरात करण्यात आले नसून ते ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचेही दास यांनी स्पष्ट केले. तसेच महागाई दर आगामी काळातही अपेक्षेपेक्षा अधिक राहणार असून भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोना महामारीच्या संकटामुळे मागणीदेखील कमीच राहण्याची भीती व्यक्त केली आहे. यापूर्वी २८ सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची बैठक पार पडणार होती, पण ही बैठक गणसंख्येअभावी पुढे ढकलण्यात आली होती.

दरम्यान रेपो दरात कोणतेही बदल भारतीय रिझर्व्ह बँकेने केले नाही. चार टक्क्यांवर रेपो दर कायम ठेवण्यात आल्याने व्याजदरातही कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. याव्यतिरिक्त रिव्हर्स रेपो दरातही बदल करण्यात आलेले नाहीत. तसेच ग्राहकांना डिसेंबर २०२० पासून कोणत्याही वेळी आरटीजीएस सुविधेचाही वापर करता येणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने केली. भारतीय वित्तीय बाजारातील तरलता वाढविण्यासाठी काही क्षेत्रांना आर्थिक मदत देणे, निर्यातीस चालना देणे आणि पेमेंट सर्व्हिस सिस्टमच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास सुलभता निर्माण करून देणे यासारख्या माध्यमातून रिझर्व्ह बँकेकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोलाची मदत केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च २०२२ पर्यंत एक लाख कोटी रुपयांची मदत देण्याची तरतूद केली आहे.

रिझर्व्ह बँकेने निर्यातीला चालना देण्यासाठी परदेशी खरेदीदारांशी करार करण्यासाठी अधिक सुविधा जाहीर केल्या आहेत. याप्रकारचा धोका सिस्टम आधारित ऑटोमॅटिक कॉशन लिस्टिंगच्या मदतीने कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कोरोना संकटामुळे देशात निर्माण झालेली भीती आणि निराशेचे वातावरण आता आशेत बदलू लागले आहे. महागाई आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत कमी होऊ शकते आणि रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्याच्या जवळपास राहण्याची शक्यता असल्याचे दास म्हणाले.

त्याचबरोबर सुरू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित जीडीपी वाढीचा दर सकारात्मक राहू शकतो. तसेच निरनिराळ्या क्षेत्रांसोबतच भारतात तेजीने आर्थिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. कृषी, कंझ्युमर गूड्स, वीज आणि औषध क्षेत्रात तेजीने वाढ होण्याची शक्यताही दास यांनी व्यक्त केली.

दरम्यान, दास यांनी समोर आलेल्या आकडेवारीवरून चांगले संकेत मिळत असल्याचे म्हटले आहे. जागतिक अर्थव्यवस्थादेखील हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक देशांमध्ये उत्पादन, रिटेल विक्रीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच निर्यातीतही सुधारणा झाल्याचे दास म्हणाले. भविष्याबाबत आम्ही विचार करत आहोत आणि सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती दिसून येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

देशाची अर्थव्यवस्था कोरोना महामारीच्या काळात निर्णायक स्थितीत प्रवेश करत आहे. उणे ९.५ टक्के जीडीपी वाढीचा दर असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सप्टेंबर महिन्यात पीएमआय वाढून ५६.९ झाला आहे. जानेवारी महिन्यानंतर तो सर्वाधिक आहे. याव्यतिरिक्त छोट्या कर्जदारांना ७.५ कोटी रूपयांच्या कर्जाला मंजूरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर गृहकर्जावरील रिस्क वॅटजेही कमी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. पण पुढे जाण्याची आमची जिद्द कायम आहे. सध्या आव्हाने कायम आहेत. पण आपण त्यांना नक्कीच पार करू. आपण कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम दूर करून पुन्हा आर्थिक वृद्धीच्या मार्गावर जाऊ असा मला विश्वास असल्याचेही दास यांनी म्हटले आहे.