भाजपच्या सांगण्यावरून बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमची उडी – दिग्विजय सिंह


नवी दिल्ली – अवघ्या काही आठवड्यांनी बिहार विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तत्पूर्वी या निवडणुकीत हळूहळू रंगत निर्माण होताना दिसत असून, आतापासूनच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडण्यास सुरूवात झाली आहे. सध्या बिहारच्या राजकीय रिंगणात एनडीए विरुद्ध महाआघाडी असे चित्र असतानाच या निवडणुकीत खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्त्वाखालील एआयएमआयएमनेही उडी घेतली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एमआयएमच्या निवडणूक लढवण्यावरून निशाणा साधत आरोप केला आहे.


एमआयएमने बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून बहुजन समाज पक्षासोबत आघाडी करून एमआयएम निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी एमआयएमच्या बिहार निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

भाजपच्या सांगण्यावरून राजद-काँग्रेस महाआघाडीला नुकसान पोहोचवण्यासाठी ओवेसी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. माझे म्हणणे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. भाजप आणि ओवेसी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका दिग्विजय सिंह यांनी ट्विट करून केली आहे. दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी अधिकृतरित्या बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर केले आहे.

आरएलएसपी आणि बसपा यांच्यासोबत आघाडी करून एमआयएम यावेळी निवडणूक लढवणार आहेत. या आघाडीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. एमआयएमसोबतच बिहार विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना देखील निवडणूक लढवणार आहेत.