अखेर तब्बल एक महिन्यानंतर रिया चक्रवर्तीला उच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला दिलासा दिला असून उच्च न्यायालयाकडून रियाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पण त्याचबरोबर रियाला पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. १ लाखांच्या जातमुचलक्यावर रियाची सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यूल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

एनसीबीकडून सुशातं सिंह प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणाऱ्या रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविक याला देखील अटक करण्यात आली होती. न्यायालयाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

न्यायालयाने रियाची सुटका करताना सांगितले आहे की, सुटकेनंतर दर १० दिवसांनी रियाने पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचे असल्यास तपास अधिकाऱ्याला कळवावे.

न्यायालयाच्या निर्णयाचे रियाचे वकील सतीश मानेशिदें यांनी स्वागत केले असून प्रतिक्रिया देताना म्हटले की, अखेर सत्याचा विजय झाला आहे. न्यायालयाने आम्ही सादर केलेले पुरावे मान्य केले आहेत. रियाची अटक आणि कोठडी ही असमर्थनीय आणि कायद्याच्या पलीकडे होती. तिचा पाठलाग करणे आता सीबीआय, ईडी आणि एनसीबीने थांबवले पाहिजे. आम्ही सत्य़ाशी बांधील आहोत. सत्यमेव जयते.