राहुल गांधींना गर्दीत फिरायची सवय नसल्यामुळे ते पडले : रावसाहेब दानवे


लातूर : कोणीही काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली नाही. पण जास्त गर्दीत फिरायची त्यांना सवय नसल्यामुळे ते पडले. मी त्यांचा विरोधी पक्ष नेते म्हणून सन्मान करतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले असून आता त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हाथरस प्रकरणाची चौकशी सुरू आहे. योगी सरकारने जर आवश्यकता पडल्यास सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याचा गुन्हेगार कोणीही असेल त्यांना पाठीशी घातले जाणार नाही, असे देखील रावसाहेब दानवे म्हणाले. हाथरस प्रकरणातील चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून मीडियाला थांबवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

सध्या मराठवाडा दौऱ्यावर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असून त्यांनी तत्पूर्वी जालना, उस्मानाबाद आणि लातूरचा दौरा केला होता. त्यांनी यावेळी उस्मानाबाद आणि लातूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी विधायक कसे चांगले आहे, याबाबतची माहिती दिली. त्यांचे निवेदन संपल्यानंतर पत्रकारांनी हाथरसमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारले. त्यावेळी त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले.

त्याचबरोबर मराठा आरक्षणाबाबत यावेळी दानवेंनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षण मिळावे, हीच भाजपाची भूमिका आहे. व्यवस्थित मांडणी राज्य सरकारने न केल्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली, अशी टीका राबसाहेब दानवे यांनी केली.