मराठा युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये: उदयनराजे


सातारा: आरक्षणाचा प्रश्न मराठा युवकांसाठी महत्त्वाचा असला तरी धीर सोडून टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयराजे भोसले यांनी केले आहे. आरक्षण नसल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नसल्याच्या नैराश्यातून बीड येथील विवेक रहाडे या युवकाने आत्महत्या केली आहे. उदयनराजे यांनी ट्विट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्याच्या कुटुंबियांना धीर दिला आहे.

युवक हे राष्ट्राचे भविष्य आहेत.भावनेच्या भरात टोकाचे पाऊल उचलून त्यांनी आत्महत्येसारखे कृत्य करणे हे समाज आणि राष्ट्राच्या दृष्टीनेही घातक ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या हक्कासाठी लढण्याला आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही. सध्या परिस्थिती प्रतिकूल असल्यासारखे वाटत असले तरी न्यायालयीन पातळीवर पूर्ण ताकदीने आपण लढा देत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली