विना व्हिसा या 16 देशांचा प्रवास करू शकतात भारतीय, सरकारने राज्यसभेत दिली माहिती


जगभरातील 16 देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भारतीय नागरिकांना कोणत्याही व्हिसाची गरज नसल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन यांनी राज्यसभेत यांनी दिली आहे. या देशांमध्ये नेपाळ, मालदीव, भूतान आणि मॉरिशस सारख्या देशांचा समावेश आहे. एका प्रश्नाचे लिखित उत्तर देताना मुरलीधरन यांनी सांगितले की, 43 देश व्हिसा-ऑन-अराइव्हलची सुविधा देतात. तर 36 देश भारतीय पासपोर्ट धारकांना ई-व्हिसाची सुविधा देतात.

ज्या देशांमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज भासत नाही, अशांमध्ये बारबाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रेनाडा, हैती, हाँगकाँग SAR, मालदीव, मॉरिशस, मोंटसेराट, नेपाळ, नीयू बेट, समोआ सेनेगल, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाइंस आणि सर्बिया या देशांचा समावेश आहे.

केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार असे देश आहेत, जे व्हिसा-ऑन-अराइव्हलची सुविधा देतात. तर श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया त्या 36 देशांमध्ये आहेत, जे ई-व्हिसा सुविधा देतात.

परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावा या दृष्टीने भारतीयांना व्हिसारहित प्रवास, व्हिसा-ऑन-अराइव्हल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्‍या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.